संपादकीयAugust 28, 2025
संपादकीय

“गणरायाच्या नावाखाली नुसता धिंगाणा नको – समाजकारणाचं गणेशोत्सव व्हावं!”

लेखक : Gajanan Gangadhar Bidkar   |  August 28, 2025

✍️संपादकीय अग्रलेख

“गणरायाच्या नावाखाली नुसता धिंगाणा नको – समाजकारणाचं गणेशोत्सव व्हावं!”

 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडली तेव्हा त्यामागे सामाजिक एकोपा, स्वातंत्र्याची जाणीव आणि सांस्कृतिक चेतना यांचा उगम होता. पण आजच्या काळात अनेक ठिकाणी या उत्सवाचे रूपांतर केवळ दिखावा, पैसे उकळणे, ध्वनीप्रदूषण आणि राजकीय भांडवल करण्याचे साधन इतक्यावरच मर्यादित झाले आहे. सार्वजनिक मंडळांची संख्या एवढ्या प्रमाणात वाढली आहे की, प्रत्येक गल्लीबोळात जणू “नेतृत्व” सिद्ध करण्याच्या स्पर्धेत मंडळे जन्म घेत आहेत. सक्षम नेतृत्वाच्या अभावामुळे गटबाजी, दुरुपयोग आणि नागरिक त्रस्त होणे, हीच वास्तवता झाली आहे.

 

भरमसाठ चंदा वसुली, महामार्गावर उभे राहून गाड्यांपुढे जबरदस्ती चंदा मागणे, गल्लीबोळातील नागरिकांना त्रास देणे, यावर पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यामागे स्थानिक नेत्यांचा दबाव, तरुणाईला कायद्याचे उल्लंघन करण्याची गोडी आणि समाजात प्रभाव पाडण्याची हाव हे प्रमुख कारण आहे. ध्वनीप्रदूषण, डीजेची कर्णकर्कश गाणी, अश्लील नृत्य, रात्रीच्या वेळी धिंगाणा यामुळे वृद्ध, आजारी नागरिकांची अक्षरशः गळचेपी होत आहे. रस्ते बंद करून मंडप उभारणे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, ही सर्व परिस्थिती “सार्वजनिक गणेशोत्सवा”ची विद्रूप प्रतिमा उभी करते.

 

यावर उपाय सोपा आहे – नेतेमंडळींनी आपल्या पदाचा दुरुपयोग टाळला पाहिजे आणि पोलीस दलाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. कायद्याच्या चौकटीत राहून मंडळांना परवानगी द्यावी, अनधिकृत मंडळांवर आळा घालावा. नागरिकांनी देणगी देताना जबाबदारीची जाणीव ठेवून मंडळांना स्पष्ट ताकीद द्यावी की रस्ते अडवून किंवा ध्वनीप्रदूषण करून उत्सव साजरा करणे मान्य नाही.

 

सांस्कृतिक कार्यक्रम, समाजसेवा, पर्यावरणपूरक उपक्रम हेच मंडळांच्या खऱ्या ओळखीचे आधार असले पाहिजेत. प्रशासनानेही आदर्श, प्रदूषणमुक्त व रहदारीमुक्त मंडळांना प्रोत्साहनपर पुरस्कार दिले पाहिजेत. उत्सव हा श्रद्धेचा, एकतेचा आणि संस्कारांचा असतो, राजकारणाचा किंवा पैशांच्या दुरुपयोगाचा नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांनी या सणाचा वापर स्वतःच्या हितासाठी करण्याऐवजी सामाजिक उपक्रमांना पाठिंबा दिला पाहिजे.

 

आज जर आपण गणेशोत्सवाला पुन्हा खऱ्या स्वरूपात आणायचे असेल, तर फक्त मूर्तीसमोर नव्हे तर आपल्या कृतीतून गणरायाला वंदन केले पाहिजे. समाजासाठी रस्ता बांधला, नाली दुरुस्त केली, शाळेत पुस्तकं वाटली किंवा आरोग्य शिबिर घेतलं – तरच लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेला खरी श्रद्धांजली ठरेल. नाहीतर श्रद्धेच्या नावाखालील हा उथळ दिखावा केवळ “सार्वजनिक विद्रूपीकरण” ठरेल.

“सण साजरा करा… पण समाजासाठी काहीतरी करा!”

 

गणेशोत्सव हा केवळ आरास, डीजे, चंदावसुली आणि मिरवणुकीचा उत्सव राहिला तर त्याला काहीही अर्थ उरत नाही. लोकमान्य टिळकांनी दिलेली ही परंपरा समाजजागृतीची होती, दंगामस्तीची नव्हे. आजची गरज आहे ती समाजकारणाशी निगडित उपक्रमांची.

 

यासाठी सरपंच, पोलीस पाटील, नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्री, पालकमंत्री यांनी पुढाकार घेऊन दहा दिवसाचा विशेष उपक्रम हाती घ्यावा.

 

एखाद्या शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य वाटप,

 

आरोग्य शिबिरे, रक्तदान, स्वच्छता मोहीम,

 

गावातील/शहरातील रस्ते, नाले, पाणीपुरवठा यावर काम,वृक्षारोपण व पर्यावरण रक्षण,

महिलांसाठी व युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे –

 

हे उपक्रम मंडळांनी समाजासाठी राबवले तरच गणरायाची खरी सेवा ठरेल.

 

फक्त एवढंच नाही तर गल्लीबोळातील पदाधिकारी व राजकारणी सदस्यांनी आपल्या नेत्याकडे या उपक्रमाची मागणी करावी. गणेशमंडळांचा उत्सव दहा दिवस टिकतो; मग दहा दिवसात समाजकारणाच्या दिशेने का नको पुढाकार? हा दबाव नेत्यांवर आला तर राजकीय नेत्यांची तळी फक्त बॅनरबाजी किंवा डीजेवर थिरकण्याऐवजी समाजासाठी काहीतरी करण्याकडे वळतील.

 

सार्वजनिक गणेशोत्सवाने जर लोककल्याणाचा मार्ग धरला तर हा उत्सव फक्त श्रद्धेचा नव्हे तर जनतेच्या खऱ्या विकासाचा उत्सव बनेल.