UncategorizedFebruary 17, 2026
Uncategorized

खारघर, नवी मुंबईत ‘हिंद-दी-चादर’ चित्ररथ उपक्रमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागमाची जनजागृती

लेखक : Gajanan Gangadhar Bidkar   |  February 17, 2026

 

 

अहिल्यानगर प्रतिनिधी, दि. १७ : खारघर, नवी मुंबई येथे येत्या २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजित ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम या भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात व्यापक जनजागृती व्हावी यासाठी विशेष चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

 

 

या चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील नागरिक, युवक, विविध समाजबांधव व भाविकांपर्यंत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, बलिदान व धर्मरक्षणाच्या महान कार्याची प्रेरणादायी माहिती पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

 

 

 

 

यावेळी बलदेव सिंग वाही, रथ जिल्हा समन्वयक महादेव कोकाटे, अमरप्रीत वाही, सोमनाथ झाडे, अश्विंदर सिंग मल्होत्रा, रविंदर सिंग नारंग, सागर बक्षी, अमनदीप वाही, हितेश ओबेरॉय, हरविंदर सिंग नारंग, मोहिंदर सिंग धुप्पड, पियुष जग्गी, मोंटू लॉंगियानी, राजेंद्र सिंग चावला, संजय आहुजा, हरप्रीत सिंग नारंग, संकेत गागरे, ब्रह्मा लॉंगियानी यांच्यासह समाजबांधव, नागरिक व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे बलिदान मानवतेच्या, धार्मिक सहिष्णुतेच्या आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी दिलेले ऐतिहासिक बलिदान आहे. त्यांच्या त्यागाचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

 

 

 

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातून दोन चित्ररथांच्या माध्यमातून विविध भागांत जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथांद्वारे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्याची माहिती, त्यांच्या शौर्याची गाथा तसेच शहीदी समागम कार्यक्रमाचे स्वरूप नागरिकांपर्यंत पोहोचविले जाणार आहे.

 

 

 

दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमात जिल्ह्यातील अधिकाधिक भाविकांनी सहभाग नोंदवावा व या प्रेरणादायी सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनीही श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाचा गौरव करत, कार्यक्रमाच्या जनजागृती साठी राबविण्यात येणारा चित्ररथ उपक्रम निश्चितच प्रभावी ठरेल, असे मत व्यक्त केले.

 

 

 

२८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जिल्ह्यातील विविध तालुके व गावांमध्ये फिरविण्यात येणाऱ्या या चित्ररथाच्या माध्यमातून शीख-शिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाजासह जिल्ह्यातील सर्व नऊ समाजांतील भाविक व नागरिकांमध्ये ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाची व्यापक माहिती देण्यात येणार आहे.