जिल्हाFebruary 20, 2026
जिल्हा

नांदेडमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्यात ॲड. दिलीप ठाकूर यांना “शिवधर्म सेवा श्री” पुरस्काराने गौरव; १०९ वा सन्मान.

लेखक : Gajanan Gangadhar Bidkar   |  February 20, 2026

 

 

नांदेड प्रतिनिधी दि.२० :- शिवजन्मोत्सवाच्या पावन आणि उत्सवी वातावरणात सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, नांदेड यांच्या वतीने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना प्रतिष्ठेचा “शिवधर्म सेवा श्री पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. छत्रपतींच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्याने सामाजिक कार्याला सन्मानाची सुवर्णझळाळी मिळाली. हा दिलीप ठाकूर यांचा १०९ वा पुरस्कार ठरला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 

 

 

 

वैद्य हॉस्पिटलसमोरील भव्य पेंडॉलमध्ये सकाळी ११ वाजता हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. स्वागतध्यक्ष अनिल धामणे पाटील यांनी ॲड. दिलीप ठाकूर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. संयोजक भास्कर हंबर्डे यांनी प्रास्ताविकातून पुरस्कारामागील उद्देश स्पष्ट करताना दिलीपभाऊंच्या २२ वर्षांच्या सातत्यपूर्ण समाजसेवेचा गौरवपूर्ण आढावा घेतला.१५ लाखांहून अधिक अन्नदान, हजारो बेघरांना चादरी, छत्र्या व चप्पलांचे वितरण, तसेच दरमहा रस्त्यावरच्या निराधारांची सेवा अशा उपक्रमांचे कौतुक यावेळी करण्यात आले.

 

 

डॉ. शीतल भालके, दिलीपसिंघ सोडी, संतोष शिंदे, उदयसिंह कच्छवे, कैलाश कुंटूरकर आणि अमित मोदी यांच्या हस्ते “शिवधर्म सेवा श्री” पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी दिलीपभाऊंच्या अन्नदान, वस्त्रदान, मानवता फ्रिज, अमरनाथ यात्रा तसेच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा विशेष उल्लेख करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

 

 

 

 

पुरस्कार स्वीकृत करताना ॲड. दिलीप ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. “हा सन्मान माझा नसून समाजातील त्या सर्व स्वयंसेवकांचा आहे, जे निरपेक्ष भावनेने सेवाकार्यात सहभागी होतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी समितीचे आभार मानत पुढेही सेवा कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

 

 

कार्यक्रमास विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात संपन्न झालेल्या या सोहळ्याने शिवजन्मोत्सव अधिक संस्मरणीय ठरला.