जिल्हाFebruary 24, 2026
जिल्हा

ग्रामपंचायतीपासून संसदेत प्रतिनिधित्व वाढवा, देगलूरकरांचे मत.

लेखक : Gajanan Gangadhar Bidkar   |  February 24, 2026

 

 

इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी उमरीच्या जयंतीत उपस्थित केला प्रश्न !

नांदेड प्रतिनिधी दि.२४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात गुरु रविदासांचा राज्य समाजवाद समाविष्ट केला असला तरीही हे संविधान राबविणारी सत्ता कुणाच्या हातात आहे ? असा प्रश्न इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी उमरीच्या जयंतीत उपस्थित केला. उमरी स्टेशन येथे वीर कक्कय्या आणि गुरु रविदास जयंती महोत्सवात अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे बोलत होते. नांदेड जिल्ह्यातील उमरी स्टेशन येथे आयोजित वीर कक्कय्या व गुरु रविदास संयुक्त जयंती महोत्सवात सेवानिवृत्त पोलीस उपआयुक्त बालाजीराव सोनटक्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व जाहिर सभा घेण्यात आली. यावेळी बालक बालकांनी आपले मनोगत मांडले.

 

 

 

 

 

सूत्रसंचलन राहुल खंदारे आष्टीकर यांनी केले तर शेवटी संतोष भगवान सुर्यवंशी यांनी आभार मानले. शेवटी प्रमुख वक्ता म्हणून इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. आपल्या परखड भाषणात ते पुढे म्हणाले की, तुलसीदास, रामदास, मनू महाराज या भारतातील कांही लोकांनी जाणीवपूर्वक माणसामाणसांत भेदभाव करणारी विषमतावादी व्यवस्था निर्माण केली होती. या व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह पुकारुन गुरु रविदासांनी बंधुता, न्याय व समतेवर आधारित मानवतावादी विचारांची मांडणी केली.

 

 

 

 

 

बेगमपूर राज्याची संकल्पना मांडली. यासाठी त्यांना बलिदान द्यावे लागले, समाजाने याची जाण ठेवली पाहिजे व लायक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण लायक होऊन सत्ता हस्तगत केल्याशिवाय संविधान पूर्णपणे लागू होऊ शकणार नाही. संविधान चांगले आहे पण सत्ता दुष्टांच्या हातात आहे. यामुळे गुरु रविदासांचे स्वप्न साकार होऊ शकणार नाही, म्हणून ग्रामपंचायत पासून ते संसदे पर्यंत आपले प्रतिनिधी निवडून गेले पाहिजे, म्हणून समाजाने चर्मोद्योग कमी करुन शासन प्रशासनात जाण्याचा प्रयत्न करावा असेही आवाहन शेवटी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.

 

 

 

 

 

मंचावर अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे विभागीय युवा प्रवक्ता चंद्रसेन गंगासागरे (घुंगराळा), लोहा तालुकाध्यक्ष लक्ष्मण फुलवरे, उमरी तालुकाध्यक्ष देविदास गंगासागरे, बहुजन समाज पक्षाचे जिल्हा महासचिव सुधाकर सरोदे (नांदेड), उमरीचे नगरसेवक साईनाथ जमदाडे, सामाजिक कार्यकर्ते नागेश भालके (नायगाव), ॲड . विश्वनाथ अहिले, गंगाधर गंगासागरे, संभाजी सुर्यवंशी, भगवान सुर्यवंशी, देविदास सुर्यवंशी, स्वागताध्यक्ष संजीव सवाई, मिलिंद सोनकांबळे आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. सर्वप्रथम वीर कक्कय्या आणि गुरु रविदास यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. स्नेहभोजनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.