जिल्हाApril 25, 2026
जिल्हा

मुबलक पाणीसाठा असूनही कासार शिरसीत पाणीटंचाई; ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह.

लेखक : Gajanan Gangadhar Bidkar   |  April 25, 2026

मुबलक पाणीसाठा असूनही कासार शिरसीत पाणीटंचाई; ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह.

 दहा कोटी रुपये खर्चून उभारलेल्या नव्या जलवाहिनीत झालेल्या कथित बोगस कामाची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी.

कासार शिरसी प्रतिनिधी: शहरात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विविध कारणांमुळे पूर्णपणे विस्कळीत झाला असून ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजाबाबत नागरिकांतून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

 

 

शहरातील जुन्या नळयोजनेवर अवलंबून असलेल्या विहिरीवर वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्याचबरोबर पाण्याची मोटार जळाल्याचे कारणही समोर येत आहे. परिणामी पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाला असून महिलांसह नागरिकांना व जनावरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

 

 

 

दरम्यान, महाराष्ट्र शासनाने सुमारे दहा कोटी रुपये खर्चून राबवलेली शुद्ध पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण झाली असली तरी नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या ठिकठिकाणी फुटत असल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या तांत्रिक बिघाडांमुळे सदर योजना सध्या बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या अधिकच गंभीर बनली आहे.

 

 

मुबलक पाणीसाठा असूनही नागरिकांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागत असल्याने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य व अकार्यक्षम कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या ज्वलंत प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

 

 

याबाबत माजी सरपंच बडे साहेब लक्कडहारे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासनावर टीका केली असून, “पाणी हा मूलभूत हक्क असूनही नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणे ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा दिला आहे.

 

 

दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार व खासदार यांनीही या प्रश्नात लक्ष घालून कायमस्वरूपी तोडगा काढावा, तसेच नव्या जलवाहिनीत झालेल्या कथित बोगस कामाची सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.