महाराष्ट्रDecember 8, 2021
महाराष्ट्र

घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणारे ‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान

लेखक : Gajanan Gangadhar Bidkar   |  December 8, 2021

मुंबई, दि. ०८ डिसेंबर : राज्यातील गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यांना पक्के व स्वत:च्या मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन राज्यात २० नोव्हेंबर २०२० पासून महाआवास अभियानाची सुरूवात केली. या पहिल्या टप्प्यात १२६० पेक्षा जास्त बहुमजली इमारती, ६३० पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच ७५० घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. सोबतच  ५० हजार ११२ भूमिहीन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका अर्थाने महाआवास अभियानाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला.

महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश पाहता दुसरा टप्पा दिनांक २० नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झाला. यात ५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. अन्य राज्याच्या तुलनेत हे महाआवास अभियान अधिक सक्षम आणि गतिमानतेने पुढे नेण्याचा निर्धार करत या पूर्ण अभियानात ७ डिसेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण राज्यात प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजनेच्या ९ लाख ८८ हजार ६९१ घरांकरिता मंजुरी देण्यात आली असून ७ लाख ४३ हजार ३२६ घरे पूर्ण झाली आहेत. दिनांक २० नोव्हेंबर २०२१ ते ७ डिसेंबर २०२१ राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील १०७१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे तर ४ हजार ६८४ घरे पूर्ण झाली आहेत.

राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना अशा विविध योजनेमार्फत ४ लाख १९ हजार ८३३ घरांकरिता मंजुरी देण्यात आली असून दिनांक ७ डिसेंबर २०२१ पर्यंत २ लाख ९५ हजार ९४१ घरे पुर्ण झाली आहेत. २० नोव्हेंबर २०२१ ते ७ डिसेंबर २०२१ या महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्य पुरस्कृत आवास योजनेतील १ हजार ९०२ घरे बांधण्यात आली आहे. उर्वरित घरे विहित मुदतीत पूर्णत्वाकडे जातील, असा विश्वास ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे यांनी व्यक्त केला आहे.