नांदेड शहरातील धडक कारवाईनंतर नागरिकांची मागणी; जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यात अशीच मोहीम राबवावी.

 

नांदेड प्रतिनिधी दि.३१ :- नांदेड शहरात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विना नंबर अवजड वाहनांवर केलेल्या धडक कारवाईनंतर नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असतानाच, हीच कारवाई केवळ शहरापुरती मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील सर्व तालुके व गावांमध्येही राबवावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

 

शहरात ११ विना क्रमांकाच्या हायवा वाहनांवर कारवाई करून दंड आकारण्यात आल्याने प्रशासनाची कडक भूमिका स्पष्ट झाली आहे. मात्र ग्रामीण भागात तसेच इतर तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर विना नंबर, अपूर्ण कागदपत्रे व नियमबाह्य पद्धतीने रेती, मुरुम व माती वाहतूक सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अशा वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था, अपघातांचे प्रमाण वाढणे तसेच शासनाचा महसूल बुडत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

 

 

“नांदेड शहरात जशी धडक कारवाई झाली, तशीच प्रत्येक तालुक्यातील गावागावात झाली पाहिजे. तेव्हाच अवैध वाहतुकीला आळा बसेल,” अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून यापुढेही अवैध वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात नांदेड जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अशाच प्रकारच्या कारवाया होतील का, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रशासनाने जिल्हाभरात एकसमान व सातत्यपूर्ण कारवाई केल्यास अवैध वाहतुकीला मोठा आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.