नगरपरिषदेला नागरिकांच्या जीवाची किंमत नाही का? — नगरसेवक मनोज तोटावार यांचा संतप्त सवाल.
देगलूर प्रतिनिधी :- देगलूर शहरातील नाटकर गल्ली परिसरात एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने अक्षरशः दहशत निर्माण केली असून, दिनांक २१ एप्रिल २०२६ पासून आजपर्यंत तब्बल १५ ते १६ नागरिकांना या कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे देगलूर नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी अमोल वाघे व सुनील वाघमारे हे आपल्या नियमित कामावर असताना त्यांनाही या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. तरीदेखील नगरपरिषद प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या संदर्भात नगरसेवक मनोज तोटावार यांनी मुख्याधिकारी मॅडम यांच्याकडे संतप्त शब्दांत नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. “नगरपरिषदेच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांना कुत्रा चावत असेल आणि प्रशासन अजूनही जागे होत नसेल, तर सामान्य नागरिकांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषदेकडून एका एजन्सीला काम देण्यात आले आहे. मात्र ही एजन्सी शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही अधिकारी केवळ हात झटकत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
नाटकर गल्ली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. “एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
नगरसेवक मनोज तोटावार यांनी मुख्याधिकारी मॅडम यांना आवाहन करत म्हटले आहे की, “झोपेचे सोंग न घेता तातडीने संबंधित कर्मचाऱ्यांना आदेश द्यावेत आणि या पिसाळलेल्या कुत्र्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल.”
दरम्यान, शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे देगलूर नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता तरी प्रशासन जागे होणार का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
