नांदेड प्रतिनिधि : स्वातंत्र्य दिन म्हणजे केवळ तिरंगा फडकविण्याचा आणि राष्ट्रगीताने सोहळा पूर्ण करण्याचा दिवस नव्हे, तर भारतीय संविधानाने दिलेली समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची मूल्ये प्रत्यक्ष जीवनात उतरविण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. याच विचाराला कृतीची जोड देत धनगरवाडी रोड, वाडी पाटी, नांदेड येथील लहुजी साळवे निराधार-निराश्रित बालकाश्रमात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर बालकाश्रमातील मुलांना ‘कृपाछत्र’ उपक्रमांतर्गत स्नेहलता जायस्वाल यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करून स्वातंत्र्य दिनाचा सामाजिक बांधिलकीचा संदेश अधिक प्रभावीपणे देण्यात आला.
तिरंगा अभिमानाने आकाशात डौलाने फडकत असताना बालकाश्रमातील प्रत्येक मुलाच्या हातात पावसापासून संरक्षण देणारी छत्री देण्यात आली. छत्री देताना दिलीप ठाकूर यांच्या चेहऱ्यावर मुलांविषयीची माया आणि आपुलकी स्पष्ट जाणवत होती, तर छत्री हातात मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य या उपक्रमाचे खरे फलित ठरले. पावसापासून बचाव करणाऱ्या छत्रीच्या रूपाने या मुलांना केवळ संरक्षण मिळाले नाही, तर समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे, हा विश्वासही मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका स्नेहलता जायस्वाल होत्या. यावेळी माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, अमरनाथ यात्री संघाचे कोषाध्यक्ष राजेशसिंह ठाकूर, संस्थेच्या अध्यक्षा सौ. रेखा घाटे, संचालक निखिल घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे सचिव लालबाजी घाटे यांनी प्रास्ताविकातून लहुजी साळवे निराधार-निराश्रित बालकाश्रमाच्या कार्याची आणि बालगृहातील मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आपल्या खास शैलीत समाजातील विविध वास्तव प्रसंग उलगडून उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. आपल्या भावनिक आणि गंभीर संदेशातून ते म्हणाले, “ही मुले दयेची नाहीत, तर संधीची अपेक्षा करतात. योग्य शिक्षण, संस्कार आणि विश्वास मिळाला तर हीच मुले उद्याच्या भारताची मजबूत पायाभरणी करतील.”
पुढे बोलताना त्यांनी भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या अधिकारांचा संदर्भ देत सांगितले की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, संस्कार आणि माणुसकी पोहोचली, तरच स्वातंत्र्य दिन साजरा केल्याचे खरे समाधान मिळेल. राष्ट्रध्वजाला मानवंदना देतानाच समाजातील गरजू घटकांच्या आयुष्यात माणुसकीचा प्रकाश निर्माण करणे हीच स्वातंत्र्याची खरी अनुभूती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणातून ज्येष्ठ समाजसेविका स्नेहलता जायस्वाल यांनी बालकाश्रमातील मुलांशी संवाद साधत त्यांना देशप्रेम, शिक्षण आणि चांगले संस्कार यांचे महत्त्व पटवून दिले. प्रत्येक मुलाने मोठे स्वप्न पाहावे आणि देशाच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर स्नेहलता जायस्वाल यांच्या हस्ते ‘कृपाछत्र’ उपक्रमांतर्गत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावर्षी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या तर्फे ४८ छत्र्या, तर स्नेहलता जायस्वाल यांच्या तर्फे ३६ छत्र्या देण्यात आल्या.या उपक्रमासाठी प्रत्येकी १६ छत्र्यांचे योगदान देणाऱ्या दानशूर नागरिकांमध्ये रुपेश रमेशराव मुत्तेपवार, डॉ. सौ. प्रणिता गुज्जरवार, प्रवीण उमाकांतराव राहटीकर, सुहास पळशीकर, निर्मला द्वारकादास अग्रवाल, अशोक पडगीलवार, मोहित व रेणुका जयप्रकाश सोनी, नायरा सुयोग चिद्दरवार, आनंद साताळे, नित्या अक्षय चिंतावार (पुणे), नव्या सौरभ रुद्रावार (सिंगापूर), ॲड. महेश भालके आणि प्राचार्य सुधीर शिवणीकर यांचा समावेश आहे.
लहुजी साळवे निराधार-निराश्रित बालकाश्रम, धनगरवाडी रोड, वाडी पाटी, नांदेडच्या वतीने अधीक्षक साहेबराव गव्हानकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणपत वाघमारे, गोणेकर सर आणि जाधव बाई यांनी परिश्रम घेतले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सेवाभाव, सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचला. तिरंग्याच्या साक्षीने निराधार बालकांच्या हातात दिलेले हे ‘कृपाछत्र’ स्वातंत्र्य दिनाच्या सामाजिक आशयाचे आणि माणुसकीच्या जिवंत भावनेचे प्रतीक ठरले.
