दगडसांगवीच्या पाणीप्रश्नावर अखेर प्रशासनाचे आश्वासन; सामूहिक उपोषणाची सांगता

दगडसांगवीच्या पाणीप्रश्नावर अखेर प्रशासनाचे आश्वासन; सामूहिक उपोषणाची सांगता.

१२ दिवसांत जलजीवन योजना सुरू करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आश्वासन; ग्रामस्थांच्या मागण्यांवर लेखी हमी

 

दगडसांगवी प्रतिनिधि : दगडसांगवी गावातील जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतील कथित त्रुटी, अपूर्ण कामे आणि गावाला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याच्या प्रश्नावर ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले. दि. १४ ते १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक लाक्षणिक उपोषणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, येत्या १२ दिवसांत पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

 

 

 

गावातील जलजीवन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. योजनेची चौकशी करून झालेली अपूर्ण व तुटफुटीची कामे तातडीने पूर्ण करावीत, विद्युत पुरवठा सुरळीत करावा आणि गावातील प्रत्येक भागाला नियमित पाणी मिळावे, या मागण्यांसाठी श्री. तुळशीराम पाटील मोरतळे, श्री. धोंडीबा पाटील फाजगे, श्री. आनंदा पाटील फाजगे यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक उपोषण करण्यात आले.

 

उपोषणाची दखल घेत जिल्हा परिषद नांदेड, पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. बनसोडे साहेब व जे.ई. श्री. मोरे साहेब यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते व ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी जलजीवन योजनेच्या प्रत्यक्ष परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी ग्रामस्थांनी पाणीपुरवठा तातडीने सुरू करणे, योजनेसाठी आवश्यक विद्युत पुरवठा सुरळीत करणे, उन्हामुळे तसेच इतर कारणांमुळे झालेली तुटफूट दुरुस्त करणे, खराब नळजोडण्या व पाइपलाइन दुरुस्त करणे, गावातील सर्व भागांना समान व नियमित पाणीपुरवठा करणे आणि जलजीवन योजना १०० टक्के कार्यान्वित करणे, या प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.

 

 

 

विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत लेखी स्वरूपात आश्वासन दिले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री. राहुल रावसाहेब सर यांनी दूरध्वनीद्वारे उपोषणस्थळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “बारा दिवसांच्या आत दगडसांगवी येथील पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येईल,” असे स्पष्ट आश्वासन दिले. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या शब्दाचा मान ठेवून ग्रामस्थांनी सामूहिक उपोषणाची सांगता केली.

आता आश्वासनाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा

उपोषणाची सांगता झाली असली तरी ग्रामस्थांचा संघर्ष संपलेला नाही. बारा दिवसांची मुदत ही आता प्रशासनासाठी कसोटीची ठरणार आहे. दिलेल्या आश्वासनानुसार योजनेतील सर्व त्रुटी दूर करून प्रत्यक्ष गावातील प्रत्येक कुटुंबाला नियमित, पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षित आहे.

 

“आम्हाला आश्वासन नको, तर प्रत्यक्ष गावाच्या नळाला पाणी हवे. प्रशासनाने दिलेला शब्द पाळून जलजीवन योजना १०० टक्के कार्यान्वित करावी आणि दगडसांगवीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली.

 

या सामूहिक उपोषणाला समस्त ग्रामस्थ, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विकासप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे प्रशासनाला दखल घ्यावी लागली असून, आता दगडसांगवी गावाला प्रत्यक्ष पाणी कधी मिळते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.