नांदेड प्रतिनिधी : मराठवाड्यात भरपूर पाऊस पडावा, पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी तसेच २७ वी अमरनाथ यात्रा निर्विघ्न व यशस्वी पार पडावी, या उद्देशाने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमरनाथ यात्री संघ, भाजप महानगर नांदेड आणि लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली २७ वी रत्नेश्वरी पाऊस दिंडी रविवारी उत्साहात संपन्न झाली.
या दिंडीत नांदेड ते रत्नेश्वरी गड मार्गावर यात्रेकरूंनी जांभूळ, सिताफळ, लिंबोळीसह विविध वृक्षांच्या हजारो बियांचे रोपण केले. तसेच सामाजिक वनीकरण विभाग, लोहा यांच्या सहकार्याने गडावर १०८ वृक्षांची लागवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक वृक्ष लावला.

सकाळी प्रतिष्ठित व्यापारी राजेश सुरतवाला यांच्या हस्ते तिरंगा झेंडा दाखवून दिंडीला प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजरात मार्गक्रमण करत विविध ठिकाणी यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले. अनेक सामाजिक संस्था व नागरिकांनी अल्पोपहार, पिण्याचे पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या.
झरी येथे सकाळी ११ वाजता सर्व यात्रेकरूंनी एकत्रितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकला. त्यानंतर रत्नेश्वरी गडावर महाआरती करून मराठवाड्यात चांगला पाऊस पडावा आणि अमरनाथ यात्रा यशस्वी व्हावी, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

विशेष म्हणजे, दिंडी संपन्न झाल्यानंतर त्याच रात्री परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने यात्रेकरूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. याकडे अनेकांनी प्रार्थनेला मिळालेला निसर्गाचा प्रतिसाद म्हणून पाहिले.
गेल्या २६ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत असलेल्या या पर्यावरण चळवळीमुळे नांदेड-रत्नेश्वरी मार्ग व गड परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षसंवर्धन झाले असून, या उपक्रमाबद्दल धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर आणि अमरनाथ यात्रेकरूंचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
