भारतीय इतिहासात धर्म, मानवता आणि स्वातंत्र्य या मूल्यांसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या महान विभूतींमध्ये नववे शीख गुरु ‘हिंद- दी -चादर’ गुरु श्री तेग बहादुर साहिब यांचे स्थान मानाचे आहे. त्यांनी केवळ शीख धर्माचेच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीचे रक्षण केले. म्हणूनच इतिहासाने त्यांना “हिंद दी चादर” ही गौरवशाली उपाधी दिली. मानवधर्माच्या अस्मिता, आदर्शाच्या मूलमंत्राला चिरंजीवी करण्यासाठी त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानासाठी जगाने त्यांना शतकानुशतके आठवणीत ठेवले आहे. भारतीय इतिहासात धर्मांतराचा मोठा प्रभाव आहे.
मात्र धर्मांतराच्या विरोधात सर्वोच्च बलिदान देत संस्कृती आणि परंपरांना टिकविण्यासाठी विपरीत परिस्थितीत त्यांनी दिलेला संदेश व त्यासाठी केलेले सर्वोच्च बलिदान भारताने आपल्या इतिहासात सुवर्णपान म्हणून जपले आहे. तत्कालीन व्यवस्थेत कितीही दबाव अन्याय, अत्याचार झाला तरी धर्मांतर न करण्याचा संदेश या सर्वोच्च बलिदानाने समाजात रुजवला.
“हिंद दी चादर” का म्हणतात?
मुघल सम्राटाच्या काळात संस्कृती नष्ट करण्यासाठी नागरिकांवर अन्याय होत असे, अशा परिस्थितीत नागरिकांनी श्री गुरू तेग बहादुर यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, प्राणाची आहुती दिली तरी संस्कृती सोडणार नाही. परकीयांच्या शक्तीपुढे गुरू तेग बहादुर कदापि झुकले नाही. या भूमिकेतून त्यांनी संपूर्ण भारतासाठी स्वतःचे जीवन तत्कालीन व्यवस्थेत कवचासारखे पुढे केले. म्हणून ते राष्ट्राचे संरक्षण करते म्हणजेच ‘हिंद- दी- चादर’ झाले.
गुरु तेग बहादुर यांची शहीदी
इ.स. 1675 मध्ये मुघल सम्राटाने त्यांच्या भूमिकेचा विरोध करत त्यांना दिल्लीला बोलावले. मात्र श्री गुरू तेग बहादुर आपल्या मतावर ठाम राहिले. त्यांना अनेक कठोर छळाला सामोरे जावे लागले. त्यांची साथ देणाऱ्या त्यांच्या तीन शिष्यांना, म्हणजेच भाई मती दास – भाई सती दास – भाई दयाला –यांना अतिशय अमानुषपणे ठार मारण्यात आले.
अशा अमानुष अत्याचारांनंतरही गुरु तेगबहादुर आपल्या श्रद्धेवर ठाम राहिले. अखेरीस चांदणी चौक, दिल्ली येथे 11 नोव्हेंबर 1675 रोजी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. जगात या बलिदानाला श्रद्धापूर्वक सर्वोच्च बलिदान संबोधले जाते.
बलिदानामागील परिस्थिती
गुरु तेग बहादुर यांचे बलिदान हे कोणत्याही राजकीय सत्तेसाठी नव्हे, तर धर्मस्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी होते. अधिकृत संदर्भ ग्रंथांमध्ये गुरु तेगबहादुर यांचे बलिदान धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान म्हणून नोंदवले गेले आहे. त्यांच्या बलिदानानंतर त्यांचे अंत्यसंस्कार विविध समुदायातील नागरिकांनी स्वत:चा जीव संकटात टाकून पूर्ण केले. त्यामुळे शीख समुदायासोबतच शीख, सिकलगीर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव, उदासिन अशा अल्पसंख्याक समुदायाच्या कार्य कर्तृत्वालाही या शहिदी समागमात सन्मानित करण्यात येत आहे.
350 व्या शहीदी समागमाचे आयोजन
महाराष्ट्र शासनाने गुरु तेग बहादुर साहिब यांचे हे सर्वोच्च बलिदानाला लक्षात घेऊन त्यांच्या 350 व्या शहिदी वर्षाला स्मरून त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शहीदी समागमाचे आयोजन केले आहे.
इ.स. 2025 हे वर्ष गुरु तेगबहादुर साहिब यांच्या 350 व्या शहीदी समागाम वर्षाचे आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत राज्यस्तरीय “350 वा शहीदी समागम” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरु तेग बहादुर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे ,धार्मिक सलोखा, संविधानिक मूल्ये व मानवतावाद अधोरेखित करणे,अल्पसंख्यांक समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे. युवा पिढीला बलिदानाची प्रेरणा देणे हा यामागील उद्देश आहे. नागपूर, नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात लाखोने भाविक उपस्थित होते. नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा आहे.
शीख व इतर समाजांचे महत्त्व
या महोत्सवात शीख, सिकलगीर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल या समाजांचा विशेष सहभाग आहे, कारण गुरु तेगबहादुर यांच्या संघर्षात हे समाज ऐतिहासिकदृष्ट्या सहभागी राहिले. धार्मिक सहिष्णुतेचा वारसा जपण्याची परंपरा या समाजांमध्ये आहे. महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक संस्कृतीची विविधता या माध्यमातून अधोरेखित होते. विशेषतः सिकलगीर शीख समाजाचा महाराष्ट्रातील ऐतिहासिक प्रवास या कार्यक्रमातून नव्याने समोर येतो.
गुरु तेगबहादुर साहिब यांचे बलिदान हे केवळ शीख इतिहासाचे नव्हे, तर संपूर्ण भारतीय संस्कृतीचे वैभव आहे. अन्यायाच्या विरोधात उभे राहून त्यांनी जो आदर्श घालून दिला, तो आजही संविधानिक भारताच्या आत्म्याशी सुसंगत आहे.
महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेला ३५० वा शहीदी समागम हा इतिहासाची उजळणी करणारा आणि भविष्याला दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. आतापर्यंत नागपूर येथे ७ डिसेंबर २०२५ ला शहीदी समागम झाले २४,२५ जानेवारीला नांदेड येथे शहीदी समागम कार्यक्रम झाला. त्यानंतर नवी मुंबई येथे हा कार्यक्रम २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी होणार आहे. देश विदेशातील शिखधर्मीय तसेच सर्व समुदायाचे नागरिक यामध्ये लोखोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत.
-प्रवीण टाके, उपसंचालक(माहिती),
विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर
(मो.नं -9702858777)
