‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील यांची मुलाखत
मुंबई प्रतिनिधी, दि. २० :- राज्यात पावसाला सुरूवात झाली असून पर्यटकांमध्ये पावसाळी वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी उत्साह निर्माण झाला आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.

राज्याला नैसर्गिक, ऐतिहासिक, धार्मिक तसेच भौगोलिक पर्यटनाची संपदा विपुल प्रमाणात लाभली आहे. राज्यातील पर्यटनाची जगभरात ओळख निर्माण करून देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी
संचालनालयामार्फत विविध उपक्रम, योजना आणि महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणे, पर्यटकांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, ग्रामीण भागातील पर्यटनाचा विकास, पावसाळी पर्यटन करताना घ्यावयाची खबरदारी अशा विषयांवर डॉ. पाटील यांनी ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.
ही मुलाखत गुरुवार, दि. २० जुलै २०२३ रोजी सायं ७.३० वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर बघता येईल. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

