नांदेड दि.०८: – नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, मुखेडसह ११ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची भेट घेऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पिकविमा रक्कम तत्काळ मंजूर करण्यावर भर देण्यात आला.
सोयाबीन, कापूस, तूर, उडीद पिकांचे हजारो एकर क्षेत्र उद्ध्वस्त झाले असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. कर्जफेड, घरखर्च, मुलांचे शिक्षण यांचा ताण वाढल्याने आत्महत्येच्या घटनांना आळा बसावा यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही भूमिका यावेळी मांडण्यात आली.
नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून मदत वितरित करणे, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना तातडीने रक्कम देणे आणि नैसर्गिक आपत्ती निधीतून अतिरिक्त तरतूद करणे या महत्त्वाच्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. कृषिमंत्री चव्हाण यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली.
