देगलूरमध्ये ३० सप्टेंबर रोजी जनआक्रोश विराट मोर्चा.
देगलूर प्रतिनिधी,दि.२६:- अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड शेतीनुकसानीबाबत शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे ३० सप्टेंबर रोजी भव्य जनआक्रोश विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
हा मोर्चा सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, देगलूर येथून निघणार असून याचे नेतृत्व नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते मोगलाजी इरन्ना शिरशेटवार करणार आहेत.
मोर्चात शासनाकडे करण्यात येणाऱ्या प्रमुख मागण्या अशा आहेत –
ढगफुटीसदृश्य पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २ लाख रुपयांचे अनुदान द्यावे.
शेतमजुरांना तात्काळ शासकीय मदत द्यावी.
शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे शैक्षणिक फी माफ करावे.
तालुक्यात पर्जन्यमापक यंत्र बसवावे.
नगरपालिकेतून जन्म-मृत्यू दाखले तातडीने उपलब्ध करून द्यावेत.
शेतकऱ्यांची वीजबिलं माफ करून १८ तास थ्री फेज वीजपुरवठा करावा.
वीज वितरण कंपनीतील भोंगळ कारभाराची चौकशी करून नागरिकांची आर्थिक लूट थांबवावी.
नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मनमानीला आळा घालावा.
देगलूर तालुका पुरबाधित क्षेत्र घोषित करून आणेवारी ५० पैशांखाली करावी.
शहर व तालुक्यात स्मार्ट मीटर बसवू नयेत.
२०२४-२५ चा प्रलंबित पिकविमा शेतकऱ्यांना मिळावा.
नदीकाठावरील खरडून गेलेल्या जमिनींसाठी नुकसानभरपाई देऊन सातबाऱ्यावर ‘पोटखराब’ नोंद टाळावी.
रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे व खत पुरवावे.
मोर्चादरम्यान काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारो शेतकरी, शेतमजूर, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, मागण्या पूर्ण न झाल्यास अमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.
