“निष्ठेला डावलून धनशक्तीला पाठबळ? पाच वर्षांच्या सेवेवर अन्याय करत भाजपमधील उमेदवारी निकषांवर प्रश्नचिन्ह – नांदेडसह संपूर्ण राज्यात असंतोषाचा भडका”

 

नांदेड प्रतिनिधी, दि. ०१ :- भारतीय जनता पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात आता उघडपणे आवाज उठू लागला असून, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १६-ड (हनुमान पेठ–गाडीपुरा) येथील प्रकरणाने राज्यभरातील पक्षसंघटनात्मक धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

 

भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून, स्थानिक पक्षश्रेष्ठींच्या अन्यायकारक भूमिकेचा जाहीर निषेध नोंदवला आहे.

 

 

 

पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने भाजपकडून उमेदवारी अर्ज भरूनही एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांचा अर्ज अपक्ष म्हणून मंजूर झाला असून, हा प्रकार म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पाच वर्षांच्या अविरत सेवेवर केलेला अन्याय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 

 

 

ठाकूर यांनी पत्रात नमूद केले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपाच्या माध्यमातून दरवर्षी तब्बल ९० समाजोपयोगी उपक्रम राबवत असून, त्यातील ३ उपक्रम ३६५ दिवस अखंड सुरू आहेत. या सेवाभावी कार्याची देशभर दखल घेतली गेली असून, आजवर १०६ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

 

 

इतकेच नव्हे तर पक्षवाढीसाठी त्यांनी १,००० नवीन भाजप सदस्यांची नोंदणी, पदवीधर मतदारसंघात ४०० मतदारांची नोंदणी, तसेच ‘मन की बात’चे ९० कार्यक्रम घेतले आहेत.

 

 

 

प्रत्येक विधानसभा व लोकसभा निवडणुकीत महिनाभर घरदार सोडून २४ तास मध्यवर्ती पक्ष कार्यालयाची जबाबदारी इमानेइतबारे पार पाडणाऱ्या कार्यकर्त्याला केवळ धनशक्ती नसल्यामुळे डावलले गेले, हा प्रकार पक्षाच्या मूळ विचारधारेशी विसंगत असल्याची भावना ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

 

 

“निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली असती तर मी निःसंशय पाठिंबा दिला असता; मात्र पक्षप्रवेशही न करता, संशयास्पद कारभार करणाऱ्याला तिकीट देण्यात आल्याने नाईलाजाने निवडणूक लढवत आहे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.

 

 

 

विशेष म्हणजे, संपूर्ण नांदेड शहरात केवळ १३ निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात आल्याचे नमूद करत, उर्वरित ठिकाणी झालेल्या अन्यायाविरोधात आपण निष्ठावंतांचा प्रतिनिधी म्हणून जनतेच्या दरबारात जात असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

 

 

“आज गप्प बसलो तर उद्या भाजपासाठी काम करणारा निष्ठावंत कार्यकर्ता शिल्लक राहणार नाही,” असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.

 

 

ही बाब केवळ नांदेडपुरती मर्यादित नसून नागपूर, लातूर, पुणे यांसह राज्यातील अनेक शहरांमध्ये निष्ठा नव्हे तर निवडणुकीच्या निकषावर, धनशक्तीच्या जोरावर उमेदवारी दिली जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

 

 

 

त्यामुळे भाजपातील जुने, प्रामाणिक कार्यकर्ते नाराज होत असून, पक्षसंघटनेला याचे दूरगामी परिणाम भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

धनशक्ती विरुद्ध सेवावृत्ती या लढाईत जनतेचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर, माफी मागून पुन्हा भाजपमध्ये सक्रिय होऊन पक्ष बळकट करणार असल्याचे स्पष्ट आश्वासनही ठाकूर यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात दिले आहे.