अमरावती प्रतिनिधी दि.१० :- जिल्हाधिकारी आशिष येरेकार यांच्या हस्ते आज ‘महारेशीम अभियान २०२६’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रेशीम रथाला हिरवी झेंडी दाखविली. तसेच रेशीम उद्योगाची माहिती जाणून घेतली.
सन २०२६-२७ या वर्षात जिल्ह्यात एकूण ८०० एकर क्षेत्रावर रेशीम शेती लागवडीचे उद्दीष्ट आहे. यात कृषि विभागातर्फे ३०० एकर, रेशीमतर्फे विभाग: २५० एकर, आणि जिल्हा परिषदेतर्फे २५० एकर रेशीम लागवड करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी जून २०२६ मध्ये तुती लागवडीसाठी ४ फेब्रुवारी ते ५ मार्चपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी ‘आपले सरकार’ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने करून त्याची प्रत जिल्हा रेशीम कार्यालयात जमा करावी लागणार आहे. यासाठी प्रति एकर ५०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे.
शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत जॉब कार्डधारक असावा आणि त्याच्याकडे सिंचनाची सोय असावी. एका गावातून किमान पाच लाभार्थी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने सातबारा, ८-अ उतारा, चतुःसिमा नकाशा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
मग्रारोहयो अंतर्गत या योजनेतून शेतकऱ्यांना तीन वर्षांसाठी मजुरी आणि साहित्यासाठी एकूण ४ लाख ३२ हजार २४० रुपये दिले जाणार आहे. सिल्क समग्र-२ योजनेतून जे शेतकरी अल्पभूधारक नाहीत, त्यांच्यासाठी ही योजना असून यात प्रवर्गांनुसार अनुदान दिले जाणार आहे. यात १ एकरसाठी ३ लाख ७५ हजार रुपये इमावसाठी ते ४ लाख ५० हजार रुपये अनुसूचित जाती, जमातीसाठी दिले जाणार आहे. २ एकरसाठी ५ लाख ६२ हजार ५०० रुपये इमावसाठी ते ६ लाख ७५ हजार रुपये अनुसूचित जाती, जमातीसाठी दिले जाणार अहो.
नोंदणी, तसेच अधिक माहितीसाठी अमरावती, तिवसा, अचलपूर, अंजनगाव सुर्जीसाठी डी. एच. नागोलकर, संपर्क ९५२७९३४५७३, मोर्शी, वरूड, चांदूरबाजार, धामणगाव रेल्वेसाठी एस. बी. भोयर, संपर्क ९३७२७९१६२६, तर नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, भातकुली, चिखलदरा, धारणीसाठी एस. एम. देठे ८८३०५९३४५९ या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
