हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाची विविध उपक्रमांतून जिल्हाभर व्यापक जनजागृती करा.

 

 

अहिल्यानगर प्रतिनिधी, दि.१० :- ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची जिल्हाभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून सर्वदूर जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

 

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत डॉ. आशिया बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी भारती गायसमुद्रे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, सहायक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, श्री गुरु तेग बहादूर यांच्या शौर्य, त्याग व बलिदानाची माहिती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, निवासी शाळा व शिक्षण संस्थांमध्ये प्रभातफेरी आयोजित करावी. तसेच त्यांच्या शहीदी स्मृतीनिमित्त तयार करण्यात आलेले व्हिडिओ व जिंगल्स शाळा व महाविद्यालयांमधून प्रसारित करावेत. विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य व निबंध स्पर्धांचे आयोजन करून उत्कृष्ट विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

 

 

 

 

कार्यक्रमाच्या अनुषंगाने १० ते २७ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात आरोग्य पंधरवडा राबविण्याच्या सूचना देत जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, औद्योगिक क्षेत्रातील कामगार, बांधकाम कामगार, ऊसतोड कामगार तसेच एस.टी. कर्मचारी, ट्रक चालक यांच्यासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत. यासोबतच रक्तदान शिबिरांचे आयोजन करून जनजागृती करावी.

 

 

 

शिर्डी येथे आयोजित साई परिक्रमेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने त्या ठिकाणीही आरोग्य शिबिरांचे आयोजन करून प्रचार-प्रसिद्धी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 

 

 

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यक साहित्य पुरवठ्यासाठी शिबिरे आयोजित करतानाच दिव्यांग तपासणी शिबिरे देखील घेण्यात यावीत. जनमानसात व्यापक जागृती निर्माण करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली सायकल रॅली आयोजित करावी. श्री गुरु तेग बहादूर यांच्या कार्याची माहिती देणारी चित्रफीत जिल्ह्यातील प्रत्येक सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले.

 

 

 

कार्यक्रमाचा प्रचार व्यापक स्वरूपात होण्यासाठी शासकीय होर्डिंग, डिजिटल बोर्ड, बसस्थानके, रेल्वेस्थानके, आकाशवाणी व विविध समाजमाध्यमांद्वारे प्रचार-प्रसिद्धी करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले.

 

 

 

यावेळी अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची माहिती देत विविध विभागांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या व नियोजनाचा आढावा मांडला. सर्वांनी समन्वयाने व एकसंघपणे काम करून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

 

 

बैठकीस बलदेवसिंग वाही, सतिंदरसिंग नारंग, राजेंद्रसिंग चावला, अश्विंदरसिंग मल्होत्रा, हरप्रितसिंग नारंग, अमनदीपसिंग वाही, रविन्दरसिंग नारंग, अमरप्रित बलदेवसिंग वाही, ब्रह्मा लोंगियानी यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.