देगलूर प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात सन 2021 ते 2024 या कालावधीत शासनाच्या गाय गोठा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. देगलूर पंचायत समिती कार्यालयातील तत्कालीन गटविकास अधिकारी शेखर देशमुख, तत्कालीन एपीओ नामदेवराव ढाले, संबंधित ग्रामसेवक, विस्तार अधिकारी तसेच अभियंता यांनी संगनमत करून तालुक्यातील विविध ग्रामीण भागांमध्ये प्रत्यक्षात गाय गोठे न बांधता लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी माधव संभाजीराव मारकवाड यांनी मागील तीन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला असून, विभागीय आयुक्त कार्यालयाकडे यासंदर्भात सविस्तर तक्रार सादर केली होती. तथापि, अद्यापपर्यंत कोणतीही चौकशी किंवा संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माधव संभाजीराव मारकवाड यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
देगलूर तालुक्यातील सर्व गावांमधील गाय गोठा योजनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अपहार झालेला निधी वसूल करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
माधव मारकवाड यांनी सांगितले की, शासनाच्या गरीब व शेतकरी हिताच्या योजनांचा गैरवापर करून भ्रष्टाचार करण्यात आला असून, प्रत्यक्ष लाभार्थ्यांना योजनेचा कोणताही फायदा मिळाला नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनामुळे देगलूर तालुक्यातील गाय गोठा योजनेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
