दिलीप ठाकूर यांच्या ‘भाऊचा माणुसकीचा फ्रिज’ उपक्रमाला सुनील राणेंची भेट; समाजसेवेचे केले कौतुक.

 

नांदेड प्रतिनिधी:- “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माणुसकी पोहोचविणे हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवा आहे,” असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुनील राणे यांनी केले. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी वर्षभरात ९० सामाजिक उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केला असून, त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

नांदेड जिल्ह्याच्या आढावा बैठकीनिमित्त शहरात आलेल्या सुनील राणे यांनी रविवारी सकाळी महावीर चौक येथील पंचवटी हनुमान मंदिर परिसरातील ‘भाऊचा माणुसकीचा फ्रिज’ या उपक्रमाला भेट दिली. या वेळी भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर उपस्थित होते.

ॲड. दिलीप ठाकूर यांनी मान्यवरांचे स्वागत शाल, मोत्यांची माळ व पुष्पगुच्छ देऊन केले. उपक्रमाची सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांपासून हा फ्रिज अखंडित सुरू असून दररोज ४० ते १२० जेवणाचे डबे येथे ठेवले जातात. गरजू नागरिक कोणताही भेदभाव न करता हे अन्न मोफत घेऊन जातात.

 

 

 

कोरोना काळात सुरू झालेला हा उपक्रम आज हजारो गरजूंना आधार देत असून, दिवाळीत मिठाई, हिवाळ्यात ब्लॅंकेट, पावसाळ्यात छत्र्या आणि उन्हाळ्यात चपला यांचेही वाटप केले जाते. तसेच मानसिकदृष्ट्या आजारी व निराधार व्यक्तींसाठी “कायापालट” उपक्रमाद्वारे दर महिन्याला सेवा कार्य सुरू आहे.

 

सुनील राणे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “भाऊचा माणुसकीचा फ्रिज हा केवळ उपक्रम नाही, तर मानवतेचा जिवंत संदेश आहे. असे उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविले गेले पाहिजेत.”

 

 

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गरजूंना जेवणाचे डबे वाटप करण्यात आले. या वेळी अनेक लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

 

ॲड. दिलीप ठाकूर यांनी यावेळी भावनिक आवाहन करत सांगितले की, वाढदिवस किंवा स्मृतिदिनानिमित्त किमान ४० जेवणाचे डबे देऊन प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी व्हावे, म्हणजे कोणीही उपाशी राहणार नाही.

 

 

या उपक्रमाच्या यशामागे स्थानिक दानशूर नागरिक व सहकाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.