विसाव्या शतकाच्या शेवटच्या दीड दशकात महाराष्ट्रातील तालुकास्तरावरील अनेक मराठी माध्यमाच्या शाळा फुलल्या .कदाचित तो काळ त्या शाळांसाठी सुवर्णकाळ ठरला. त्या सुवर्णक्षणांचे आम्ही सुवर्ण साक्षीदार. कोरोनाच्या संकटानंतर भानावर आलेल्या आपल्या सर्वांना जगन मिथ्या ब्रह्म सत्य या उक्तीचा प्रत्यय आलाच असेल.
या आणि अशा अनेक कारणामुळे गेल्या वर्षभरात अनेकांनी गेट-टुगेदर चे आयोजन केले त्यापैकी आमची साधना हायस्कूल ९४ बॅचनेही २७ जानेवारीला गेट-टुगेदर चे आयोजन देगलूर येथे केले. आम्ही देगलूर निवासी मित्रांनी हे आयोजन करण्यासाठी जवळपास एक महिना मेहनत घेतली. सर्व देहभान विसरून आम्ही हे करत होतो.
आमच्या बॅचमधील २० डॉक्टर्स, २५ अभियंते, २० व्यावसायिक, १० शिक्षक,१० शासकीय कर्मचारी, १० ग्रहणी, १० शेतकरी तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांनी आपली पद प्रतिष्ठा विसरून केवळ बाल वर्गमित्र व वर्ग मैत्रिणी आहोत याच एका भावनेने एकत्र येऊन तो कार्यक्रम अविस्मरणीय, केवळ अविस्मरणीय बनवला.

२८ ,२९ तारखेला ही बाहेर गावून आलेल्या मित्रांच्या गाठीभेटी सुरूच होत्या. एक वेगळ्या भाव विश्वात आम्ही सर्वजण गेलो होतो. आज पाच फेब्रुवारी रविवार चा दिवस होता. कामे बरीच खोळंबली होती. पौर्णिमेचा दिवस घरात सत्यनारायणाची पूजा आणि नवे गहू सुहासिनींना जेवण या पारंपरिक रीतीरीवाजाचा सोपस्कार पार पाडण्याचा घाट माझ्या पत्नीने घातला त्यामुळे मी घरीच होतो .
देगलूरच्या एका तरुण राजकीय नेत्याला घरी बोलवून त्याच्या वाढदिवसाबद्दल अभिष्टचिंतन केले, मदनूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व स्मारक उभारणीसाठी निधी संकलन करण्यासाठी काही निवडक अनुभवी मंडळी माझ्याकडे आली आणि माझ्या गावातील काही मंडळी मला मुद्दाम भेटायला आली होती त्याचे कारणही तसेच होते लच्छन येथे शिवनाम सप्ताह चे आयोजन आणि मग त्यात तीन जगद्गुरुची उपस्थिती तसेच एक लाख लोकांना अन्नदानाचा संकल्प लच्छन च्या वीरशैव लिंगायत समाजाने गावकऱ्यांच्या साथीने मांडला.
वरील तिन्ही घटनांमध्ये मुख्य चर्चेचा विषय आपल्या गेट-टुगेदरचाच होता हे एक आश्चर्यच या कार्यक्रमाची देगलूर आणि देगलूरच्या परिसरात प्रचंड चर्चा आहे .मी त्यांना सांगितलं माझ्या बॅचमधील प्रत्येक वर्ग मित्र व वर्ग मैत्रीण हिऱ्यासारखे आहेत आणि या सर्व हिऱ्यांची रास त्यादिवशी बनली या राशीतून जो तेजोमय प्रकाश निघाला तो तुम्हा आम्हा सर्वांनाच डोळे दिपवणारा ठरला.
दुपार झाली होती मी हे गाठीभेटीचे सत्र उरकलं पत्नीच्या सूचना ऐकत निमुटपणे पूजा केली हा एक छोटे खानी कुटुंबाचा कार्यक्रम होता .या कार्यक्रमाला माझी कुटुंबातील सर्व सदस्य व माझ्या दोन बहिणी भाचे भाची यांची उपस्थिती होती. या सर्वांना जोडणारा आनंदाचा झरा म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीची अडीच वर्षाची नात आरवी.ती या सर्वांना खिळवून ठेवत होती. मी हळूच त्या सर्वांमधून काढता पाय घेतला आणि घराच्या एका कोपऱ्यात साधना हायस्कूल ९४ बॅच ग्रुप काढून मेसेज वाचण्यात गुंग झालो.
गेल्या महिन्याभरात झाल ही तसंच होतं. घरातील मोठ्याने तर नादच सोडला होता लहान असलेली माझ्याकडे बघत हसत खिदळत होती. तर पत्नी मला धोक्याची सूचना तसेच निर्वाणीचा इशारा देतच होती. वळीवाचा पाऊस पडावा आणि साऱ्या असमंतासह सृष्टीला ओल चिंब करावं. त्या पावसाच्या पाण्याने तेवढ्याच जोश आणि उत्साहात एका तलावाकडे धाव घ्यावी आणि तितक्यात ताकतीन तलावाचे बांध तोडावेत अन मग प्रचंड वेगाने उसळत सागराकडे खळखळत जाव. असंच काहीस भावनांचे दर्शन आमच्या ग्रुप वर होत होतं.
आनंदाचा झरा असणारी आर्वी माझ्याकडे आली हळूच माझ्या हातातील मोबाईल काढून घेतला आपल्या नाजूक हाताने माझी हनवट वर करत लाडीक आवाजात मला म्हणाली ” बाबा वेडा झालास तू ” या तिच्या एका वाक्याने माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी हाश्याचा टाहो फोडला ज्या काही आनंद लहरी उसळल्या त्या माझ्या घराच्या भिंती कधीच ओलांडून गेल्या होत्या त्या आनंदाच्या लाटावर स्वार झालो. अन या आनंदसागरात स्वतःला मी विरघळून टाकलं.
धन्यवाद..
टीप मी जेव्हा हा लेख पुण्यात राहणाऱ्या माझ्या एका मित्राला ज्याचे नाव सचिन पांगरेकर आहे, वाचून दाखवल त्यांनी वरील शीर्षक सुचवलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद
उन्हाळ्यात अचानकपणे वादळ वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाला वळीवाचा पाऊस म्हणतात.
मी एक आनंदयात्री @
राजू पाटील लच्छनकर
६३०४८७३७२४


