नांदेड प्रतिनिधी दि.१० :- पंजाब येथून सरदार कुलदीपसिंघ यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सचखंड श्री हुजूर साहब जथ्था कमिटी, लुधियानाच्या १२५ सदस्यीय जत्थ्याने नांदेड परिसरातील सर्व पवित्र गुरुद्वाऱ्यांची श्रद्धेने व भक्तिभावाने परिक्रमा पूर्ण केली. या आत्मिक प्रवासानंतर परतीच्या प्रवासासाठी निघताना, माणुसकी, सेवाभाव आणि अखंड भाईचाऱ्याचे जिवंत प्रतीक ठरलेल्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या वतीने सलग २६व्या वर्षी सर्व भाविकांसाठी प्रेमपूर्वक अल्पोपाहाराची व्यवस्था करून निरोप देण्यात आला. हा क्षण केवळ निरोपाचा नव्हता, तर दोन धर्मांतील सेवाभाव, विश्वास आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ करणारा होता.
गेल्या तब्बल २६ वर्षांपासून सरदार कुलदीपसिंघ हे दरवर्षी पंजाबातील विविध शहरांमधून भाविकांना एकत्र करून सचखंड श्री हुजूर साहब, नांदेड येथे दर्शनासाठी आणत आहेत. दरवर्षी न चुकता या भाविकांच्या सेवेसाठी ॲड. दिलीप ठाकूर व पंढरीनाथ बोकारे हे अल्पोपाहाराची व्यवस्था करीत असून, ही परंपरा आता केवळ औपचारिक सेवा न राहता एक भावनिक नाते बनली आहे. विशेष म्हणजे, याच सेवाभावाचा प्रत्यय अमरनाथ यात्रेदरम्यानही येतो—ॲड. दिलीप ठाकूर अमरनाथ यात्रेला जात असताना सरदार कुलदीपसिंघ हे लुधियाना रेल्वे स्थानकावर सर्व यात्रेकरूंकरिता लंगरची व्यवस्था करतात. “सेवा हाच धर्म” या विचाराने दोघांनीही गेल्या अनेक वर्षांत आपसी भाईचारा जपला आहे.
यावर्षी १ फेब्रुवारी रोजी लुधियानाहून निघालेल्या या १० दिवसांच्या पवित्र यात्रेत जत्थ्याने सचखंड गुरुद्वारा, लंगर साहब गुरुद्वारा, शिखरघाट गुरुद्वारा, माता साहेब गुरुद्वारा, नगीनाघाट गुरुद्वारा, बंदाघाट गुरुद्वारा, नानकसर गुरुद्वारा तसेच संत नामदेव महाराज यांच्या नरसी नामदेव येथील गुरुद्वाऱ्याचे दर्शन घेतले. या यात्रेत प्रत्येक थांब्यावर श्रद्धा, कीर्तन, लंगर आणि परस्पर स्नेहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
या जत्थ्यात सरदार कुलदीपसिंघ, सरदार गुरमीतसिंघ, सरदार अमरजीतसिंघ, सरदार काश्मीरसिंघ, सरदार लखासिंघ, सरदार तारासिंघ, सरदार दविंदरसिंघ, बीबी गुरमीतकौर, बीबी स्वर्णजीतकौर, बीबी बलजीतकौर, बीबी हरप्रीतकौर, बीबी बलविंदरकौर, बीबी जसबीरकौर यांच्यासह एकूण ५५ पुरुष व ७० महिला भाविक सहभागी झाले होते. महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग हे या यात्रेचे वैशिष्ट्य ठरले.
परतीच्या प्रवासावेळी नांदेड रेल्वे स्थानक येथे निरोप देताना वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. राजेशसिंघ ठाकूर, घुमान यात्रेचे पंढरीनाथ बोकारे, शीख संगतचे दत्ता कुलकर्णी, राजेशसिंघ ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “हा निरोप नाही, तर पुढील भेटीचे वचन आहे,” अशा भावना अनेकांच्या डोळ्यांत दिसत होत्या.
यावेळी सरदार कुलदीपसिंघ यांनी आगामी अमरनाथ यात्रा मध्ये सेवा करण्याची संधी द्यावी, असे आग्रहाचे निमंत्रण देत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. धर्म, भाषा आणि प्रांत यांच्या सीमा ओलांडून सेवाभावाने जोडलेले हे नाते नांदेडच्या सामाजिक एकात्मतेचे आणि भारताच्या सांस्कृतिक समन्वयाचे सुंदर उदाहरण ठरत आहे.
