नांदेड प्रतिनिधी दि.१२ :- नांदेड मध्ये होणाऱ्या आठव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे विभागीय युवा प्रवक्ता चंद्रसेन गंगासागरे (घुंगराळा) यांनी केले आहे.
संत शिरोमणी विश्वगुरू रविदास महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदेड येथे भव्य अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात विविध साहित्यिकांचे परिसंवाद व संत साहित्यावर आधारित व्याख्याने तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
जातीभेद विरहित समाजाची निर्मिती व गुरु रविदास यांच्या शिकवणीवर आधारित साहित्याचा गौरव करणे आणि संत शिरोमणी गुरु रविदास यांच्या विचारांचा प्रसार, समतावादी समाजाची संकल्पना, साहित्याद्वारे मानवतावादी संदेश देणे हा या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.
वीर कक्कया, गुरु रविदास, संत सेवालाल महाराज आणि माता रमाई यांच्या जयंती निमित्त विश्व गुरु रविदास समता परिषद सामाजिक प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने आयोजित आठव्या अखिल भारतीय एक दिवसीय गुरु रविदास साहित्य संमेलनाच्या अध्यक्षास्थानी प्रा. डॉ. निर्मला भामोदे (प्रसिद्ध साहित्यिक, अकोला) ह्या राहणार असून विशेष अतिथी स. बाबा बलविंदर सिंघ (प्रमुख, गुरुद्वारा लंग साहिब नगीना घाट नांदेड) यांची उपस्थिती राहणार आहे.
या साहित्य संमेलनाचे उद्घाटक मा. शहाजी उमाप साहेब (पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड) यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आदिवासी युवा नेते प्रवीण जेठेवाड, आयोजक मनीषभाऊ कावळे (बसपा मराठवाडा झोन प्रभारी), निमंत्रक उत्तम गायकवाड (प्रदेश संघटक समता परिषद), मुख्य प्रवर्तक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर (अ. भा. गुरु रविदास समता परिषद संस्थापक) हे जय्यत तयारी करीत आहेत.
बहुजन समाजातील सर्व साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक, कवी, लेखक, कथाकार, सर्व कलाकार, साहित्य रसिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलनाची शोभा वाढवावी आणि परिवर्तनवादी विचारांचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे विभागीय युवा प्रवक्ता चंद्रसेन गंगासागरे यांनी केले आहे.
