मुंबई प्रतिनिधी – साप्ताहिक महिमा खादीचा : महाराष्ट्र राज्यात सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असून रात्री थंडीचा गारठा वाढत आहे, तर दिवसा कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी व कफ यांसारख्या व्हायरल आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे.
मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात रात्री तापमानात घट नोंदवली जात आहे. तर दुपारच्या सुमारास तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका अधिक तीव्र जाणवत आहे. या विसंगत हवामानामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिक अधिक त्रस्त होत आहेत.
राज्यातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी-खोकला व तापाच्या रुग्णांची संख्या वाढली असून डॉक्टरांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. बदलत्या हवामानात रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने अशा आजारांचा प्रादुर्भाव वाढतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सदस्यांचा सल्ला :
सकाळ-संध्याकाळ उबदार कपडे वापरावेत
थंड पेये व थंड पदार्थ टाळावेत
कोमट पाणी व वाफ घेण्याची सवय ठेवावी
लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी
आजार अंगावर काढू नये
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत दिवसा तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
