नांदेड प्रतिनिधी दि.१७ :- सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, नांदेड यांच्या वतीने यंदाच्या शिवजन्मोत्सवानिमित्त धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना प्रतिष्ठेचा “शिवधर्म सेवा श्री पुरस्कार” प्रदान करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा समितीचे पदाधिकारी भास्करराव हंबर्डे, अनिल धामणे पाटील आणि श्रीदेवी पाटील यांनी केली आहे. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना हा १०९ वा पुरस्कार मिळत असल्याने त्यांच्या कार्याची दखल राज्यभर घेतली जात आहे.
दि. १९ फेब्रुवारी, शिवजन्मोत्सवाच्या पवित्र दिवशी सकाळी ११ वाजता वैद्य हॉस्पिटलसमोरील भव्य पेंडॉलमध्ये हा गौरव सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यास शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी समाजकार्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याने या गौरवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार, हिंदवी स्वराज्याच्या तत्त्वांची जपणूक आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची परंपरा समितीने जपली आहे.
१०९ वा पुरस्कार – कार्याचा गौरव
अॅड.दिलीप ठाकूर यांनी २२ वर्षांत १५ लाखांहून अधिक जेवणाचे डबे गरजूंना वाटून समाजसेवेत अद्वितीय असे कार्य करून दाखवले आहे!
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी रस्त्यावर आयुष्य कंठणाऱ्या, बेसहारा, असहाय, दुर्बल व मानसिक संतुलन गमावलेल्या लोकांना एकत्र करून, त्यांची केस-दाढी कटिंग करणे, स्वच्छ पाण्याने अंघोळ घालणे, नवीन कपडे देणे आणि १०० रुपयांचे बक्षीस देणे हे कार्य गेल्या 72 महिन्यांपासून अविरत सुरू आहे.गेल्या ७ वर्षांपासून प्रत्येक हिवाळ्यात सलग ४० रात्री रस्त्यांवर झोपणाऱ्या बेघर लोकांना 14000 पेक्षा जास्त उबदार चादरी वाटण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात “कृपाछत्र” उपक्रमांतर्गत गेल्या 7 वर्षांत 14,००० हून अधिक छत्र्या वितरित करण्यात आल्या आहेत.”चरण सेवा” उपक्रमाअंतर्गत उन्हाळ्यात नंगे पाय चालणाऱ्या लोकांना 14000 चप्पलांचे वितरण करण्यात आले .
नांदेड शहरात अन्न वाया जाऊ नये आणि कोणीही उपाशी राहू नये म्हणून त्यांनी 4 वर्षांपूर्वी “भाऊचा मानवता फ्रिज” सुरू केला. या फ्रिजमध्ये दररोज किमान ४० ते १२० जेवणाचे डबे ठेवले जातात, जे गरजूंनी घेऊन आपली भूक भागवली जाते.
अशा अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन दिलीपभाऊ सतत करत असतात.
सामाजिक कार्यांसोबतच ते धार्मिक कार्यांमध्येही अग्रेसर आहेत.त्यांनी सत्यगणपती, औंढा नागनाथ, श्री क्षेत्र माहूर, रत्नेश्वरी यांसारख्या अनेक पदयात्रांचे आयोजन करून लोकांमध्ये धर्माविषयी आणि आरोग्याविषयी जागृती निर्माण केली आहे.”ना नफा ना तोटा ” या तत्त्वावर 26 वर्षांपासून दरवर्षी अमरनाथ यात्रेचे आयोजन करत असून, त्यांनी शेकडो ज्येष्ठ नागरिकांना कठीण अमरनाथ यात्रा करून दिली आहे.
25 वर्षांपासून त्रिपुरारी पौर्णिमेला दरवर्षी हजारो महिला हरिद्वार-वाराणसीच्या धर्तीवर नांदेडमध्ये आयोजित “गोदावरी गंगा पूजा” कार्यक्रमात सहभागी होतात.गेल्या ३६ वर्षांपासून ते एसटी कर्मचारी गणेश मंडळाला दरवर्षी गणपतीची मूर्ती देत आहेत. त्यांच्या संग्रही देशभरातून आणलेल्या ५०० हून अधिक गणेश मूर्तींचा संग्रह आहे.
नांदेडमध्ये त्यांनी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, विविध खेळ स्पर्धा, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा अशा ९० पेक्षा अधिक उपक्रमांचे दरवर्षी आयोजन करत आहेत .शालेय साहित्य वाटप, आरोग्य तपासणी शिबिर, मोफत औषध वाटप हे कार्य ते गेली ४० वर्षे नियमित करत आहेत.कोरोना काळात बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन जेवणाचे डबे वाटले.
अशा समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांना आतापर्यंत देश-विदेशातून 108 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
अशा विविध पद्धतीने समाजसेवा करणारा संपूर्ण भारतात दिलीप भाऊंसारखा दुसरा कोणी सापडणे कठीण असल्यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “शिवधर्म सेवा श्री पुरस्कार” हा केवळ सन्मान नसून समाजकार्यासाठी प्रेरणादायी ठरणारा मानाचा किताब आहे. ॲड. दिलीप ठाकूर यांचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांशी सुसंगत असून त्यांच्या योगदानाचा गौरव करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
”या घोषणेनंतर विविध सामाजिक संघटनांकडून ॲड. दिलीप ठाकूर यांचे अभिनंदन करण्यात येत असून शिवजन्मोत्सवाच्या दिवशी होणाऱ्या या गौरव सोहळ्याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
