देगलूर प्रतिनिधी:भारतीय समाजव्यवस्थेत अस्पृश्यता, दारिद्र्य आणि अज्ञान या समस्यांवर मात करण्यासाठी ज्ञानसाधनाच प्रभावी शस्त्र असल्याचे प्रतिपादन डॉ. एम. एम. बामने यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
अडत व्यापारी शिक्षण संस्था संचालित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग आणि ‘The Forum of Public Administration, Nanded’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. संजय पाटील होते.
आपल्या भाषणात डॉ. बामने यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी प्रचंड अभ्यास आणि ज्ञानसाधनेच्या जोरावर समाजात क्रांती घडवून आणली. त्यांच्या विचारांमुळे कोट्यवधी वंचित घटकांना नवी दिशा मिळाली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ. बी. आर. कतूरवार यांनी आंबेडकरांच्या ज्ञानसाधनेचे महत्त्व अधोरेखित करत, मागासवर्गीय समाजाला शिक्षण, राजकारण, अर्थकारण आणि प्रशासन क्षेत्रात प्रवेश मिळवून देण्यात त्यांच्या योगदानाचा गौरव केला.
यावेळी उपप्राचार्य डॉ. एम. एम. चमकुडे यांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा बाबासाहेबांचा मंत्र आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे सांगितले. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. व्ही. जे. शेरीकर व पर्यवेक्षक प्रा. संजय पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय देबडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. धनराज लझडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. यादव भुयारे आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
