देगलूर प्रतिनिधी : देगलूर येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.
सध्या देगलूर तालुक्यातील नागरिकांना जिल्हा सत्र न्यायालयाच्या कामासाठी बिलोली येथे जावे लागते. मात्र बिलोली हे सुमारे ८० किलोमीटर अंतरावर असल्याने प्रवास करणे नागरिकांसाठी मोठी गैरसोय ठरत आहे. विशेषतः वयोवृद्ध, महिला पक्षकार आणि ग्रामीण भागातील लोकांना दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
देगलूर हे उपजिल्ह्याचे ठिकाण असून, तालुक्यातील न्यायालयीन प्रकरणांची संख्या लक्षणीय आहे. सुरू असलेल्या अनेक प्रकरणांमध्ये देगलूर तालुक्यातील प्रकरणांचे प्रमाण निम्म्यापेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय, देगलूर येथे न्यायालयासाठी आवश्यक जागेची कमतरता नसून जुन्या न्यायालयीन इमारतीच्या जागी नवीन भव्य इमारत उभारण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू करण्यासाठी सर्व अनुकूल परिस्थिती उपलब्ध असल्याचे धनाजी जोशी यांनी निवेदनात नमूद केले.
देगलूरच्या नागरिकांच्या न्यायसुविधेसाठी तातडीने प्रस्ताव सादर करून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर करावे, अशी मागणी त्यांनी मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे केली.
