भारतीय जनता मजदूर संघाच्या राष्ट्रव्यापी अभियानाला यश; महाराष्ट्रातही योजना लागू करण्याची मागणी
केज / प्रतिनिधी : उत्तर प्रदेश सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्यासह त्यांना ५ लाख रुपयांपर्यंतचे आयुष्यमान आरोग्य विमा संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे भारतीय जनता मजदूर संघातर्फे (BJMS) उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले आहे.
भारतीय जनता मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाश जाटव यांनी उत्तर प्रदेशातील लाखो अंगणवाडी भगिनींचे अभिनंदन करत हा निर्णय त्यांच्या प्रदीर्घ संघर्ष आणि सेवेला मिळालेला योग्य न्याय असल्याचे सांगितले. महिला व बालविकासाच्या योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतीय जनता मजदूर संघाने ३१ डिसेंबर २०२५ पासून अंगणवाडी, आशा, आशा संगिनी आणि माध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी निवेदन मोहीम राबवली होती. कर्मचाऱ्यांना श्रमिक दर्जा, न्याय्य मानधन, आरोग्य विमा आणि सामाजिक सुरक्षा मिळावी, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता.
उत्तर प्रदेशातील या निर्णयामुळे देशभरातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला नवी उमेद मिळाली असून, सर्व अंगणवाडी व आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मानजनक मानधन आणि सामाजिक सुरक्षा मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार शांत प्रकाश जाटव यांनी व्यक्त केला.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारनेही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अशाच प्रकारची मानधनवाढ व ५ लाख रुपयांचे आरोग्य कवच लागू करावे, अशी मागणी भारतीय जनता मजदूर संघाचे राष्ट्रीय सचिव भाऊसाहेब घोडके, महाराष्ट्र सचिव धनंजय कुलकर्णी आणि मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.