पालघर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ४६९६९९ हेक्टर इतके असून लागवडीखालील क्षेत्र १३३०४७ हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामात ११०००० लागवड करण्यात आली आहे.
आतापर्यंत जवळपास १०५ टक्के क्षेत्रावर लागवड झालेली आहे. पिकांसाठी लागणारे खते नियोजनाप्रमाणे पुरवठा झालेला असून कुठलाही तुटवडा झालेला नाही.
कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचा कृषी क्षेत्रात असलेला अभ्यास आणि अनुभव पालघर जिल्ह्याच्या कृषी धोरणाला चालना देणारा आहे श्री. भुसे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याची कृषी क्षेत्रामध्ये प्रगती झाल्याचे दिसून येत आहे.
फळबाग लागवड – जिल्ह्यातील शेतक-यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी याकरिता पिक पद्धतीत बदल करण्यावर भर देण्यात आला आहे. या माध्यमातून गेल्यावर्षी म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ८००२ लाभ धारकांनी विविध फळपिकाची ३६७९.६२ हेक्टर वर लागवड करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यावर्षी २७०० हेक्टर फळबाग लागवड लक्षांक आहे. या मध्ये प्रामुख्याने काजूच्या जवळ पास २.०० लाख कलमांची लागवड करण्याचे नियोजित आहे.
स्ट्रोबेरी लागवड – गेल्यावर्षी प्रायोगिक तत्वावर जव्हार व मोखाडा तालुक्यात स्ट्रोबेरीची लागवड केली. त्यापासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. त्याच धर्तीवर यावर्षी जव्हार व मोखाडा तालुक्यात प्रत्येकी १० हेक्टर याप्रमाणे एकूण २० हेक्टर क्षेत्र विस्तार कार्यक्रम अंतर्गत लागवड करण्यात येणार आहे.
काळ्या भाताची लागवड – सन २०२१-२२ पालघर जिल्ह्यात आत्मा अंतर्गत ५०० एकर क्षेत्रावर पिक प्रात्याक्षिके राबविण्यात येत आहे.
करटोली लागवड – रानभाज्यांचे आहारातील महत्व बघता रानभाज्यांचे क्षेत्र वाढवण्याकरिता जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर १५०० रोपांची २३ शेतकऱ्यांकडे लागवड करण्यात आली आहे.
बांधावर तूर लागवड – पालघर जिल्ह्यात शेतीचे उत्पन्न वाढविणे, कडधान्य क्षेत्रात वाढ करणे, कुपोषण थांबविणे यादृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आदिवासी शेतकऱ्यांचा भात शेती बांधावर तूर लागवड करण्यात आली. त्यापासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळालेले असून त्यांचा आर्थिक स्तर उंचविण्यास मदत झाली आहे. हा अनुभव बघता यावर्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख शेतकऱ्यांना २५० ग्रॅम प्रती शेतकरी याप्रमाणे २५० क्विंटल तूर बियाणे वाटप करण्यात आले.
पालघर जिल्ह्यात शेतीचे उत्पन्न वाढविणे, कडधान्य क्षेत्रात वाढ करण्याकरिता खरीप हंगामानंतर दुबार पिक पेरणी करून कडधान्य क्षेत्रात वाढ करणे. रब्बी हंगामासाठी ४६५.५० क्विंटल हरभरा बियाणे मागणी नोंदविली आहे.
विकेल ते पिकेल अंतर्गत जिल्ह्यातील बहाडोली येथील जांभूळ शेतकरी गटामार्फत अर्धा किलो व एक किलोच्या पॅकिंग बॉक्स मध्ये विक्री करण्यात आली.
जिल्ह्यातील पालघर तालुक्यात काळ्या तिळाचे उत्पन्न होते. क्षेत्र विस्तार अंतर्गत शेतकरी गट स्थापन करून काळ्या तिळाचे क्षेत्र वाढविण्याचे नियोजित आहे.
राहुल भालेराव
जिल्हा माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, पालघर