हिंगोली, दि. २१ : येथील नेहरु युवा केंद्र व युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियान २.० चा कार्यक्रम पूर्ण भारतात ०२ आक्टोंबर २०२२ ते ३१ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत चालू आहे. त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील लिंगदरी या गावी मेगा स्वच्छ भारत अभियान २.० कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी गावातील सर्व गाव परिसर स्वच्छ करण्यात आला. गावातील प्लास्टिक कचरा एकत्र जमा करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच नेहरु युवा केंद्राच्या युवा कर्मिने गावात स्वच्छतेची शपथ दिली व गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले.

प्रत्येकाने आपला गाव, आपला परिसर, आपले घर कसे स्वच्छ ठेवले पाहिजे आणि ते ठेवल्याने आपण होणाऱ्या रोगराईपासून कसे दूर राहील हे व राष्ट्रपिता महात्मा गांधीजीने पाहिलेलं स्वप्न आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करुया याविषयी मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक प्रवीण पांडे, नामदेव फरकांडे, गजानन आडे, संदिप शिंदे यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला विद्यार्थी, गावातील युवा, युवती , सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक आदीची उपस्थिती होती.

