प्रवास….

जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी जगभरात साजरा करण्यात आला. माझ्या चार बहिणी सदैव माझ्यावर माया करणाऱ्या, माझी पत्नी संसाराला संपूर्णपणे समर्पित , आई नंतर आईचे प्रेम देणारी माझी काकू, माझी मुलगी, माझी तिन्ही भाच्चे, माझे वर्ग मैत्रिणी, माझ्या जीवनात वेळोवेळी विविध रूपात साथ देणाऱ्या अनेक महिला या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

आजच्या दिवशी आठवण येते ती आईची जिने मला हे शरीर व प्राण दिले. आईविना पंचवीस वर्षे जगताना काही आई बद्दल लिहावेसे वाटते पण तो माझा अधिकार नाही आईवर लिहावे तर फक्त आणि फक्त साने गुरुजींनी.

 

 

 

मी जेव्हा माझ्या आई बद्दल काही लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा भावना आभाळावर पोहोचतात मन दुखाच्या सागरात डुंबून जात. शब्द सुचेनासे होतात. मन राहवेनासे होते ते आईला शोधू लागते. कुठेतरी जाऊन तिला शोधून आनवसे वाटते. जरी शब्द सुचले तरी माझी लेखणी ते शब्द मांडू शकत नाही तिचाही नुसता थरकाप उडतो. माझी लेखणीही भावविवश होऊन थरथरायला लागते.

 

 

 

 

म्हणून केवळ एक आई सोबतचा प्रसंग शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतो हा लेख मी माझी पत्नी ,आजी, मावशी, बहीण, मुलगी ,भाची ,वहिनी ,काकू, आत्या, मामी, मेहुणी ,सासू ,वर्गमैत्रिणी तसेच माझ्या आईस समर्पित करतो.

 

 

 

 

जन्म आणि मृत्यू मधील प्रवासाला आयुष्य किंवा जीवन म्हणतात .जीवनात पण वेगवेगळे प्रवास आपण करतो .जसे वयाचा प्रवास बालअवस्था, किशोरावस्था, तरुणावस्था, अर्धवयस्क , वयस्कर आणि म्हातारपण या अवस्थांचा प्रवास आपण जीवनात करतो. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षणाचा प्रवास आपण करतो.

 

 

 

रोजच्या जीवनात कामाला जाण्यासाठी केलेला प्रवास, एखाद्या लग्न समारंभात वऱ्हाडी म्हणून केलेला प्रवास ,पाहुण्याकडे जाण्यासाठी केलेला प्रवास, कुटुंबासोबत केलेला प्रवास ,पर्यटनासाठी केलेला प्रवास ,देवदर्शनासाठी केलेला प्रवास ,व्यापारी म्हणून माला सोबत केलेला प्रवास, शिक्षक या नात्याने मुलासोबत सहलीसाठी म्हणून केलेला प्रवास, तर कधीही आई-वडिलांसोबत बालपणी केलेला प्रवास किंवा कुटुंब प्रमुख म्हणून विविध कार्यासाठी केलेला प्रवास आपण अनुभवला असेलच.

 

 

 

 

एक शेतकरी या नात्याने शेतीमाला सोबत केलेला प्रवास, गोपालक म्हणून ढोर जनावरांसोबत केलेला प्रवास, असे अनेक प्रवास मी अनुभवले आहेत. सायकल, मोटरसायकलचा प्रवास ,कारचा प्रवास, ट्रेनचा प्रवास ,बैलगाडीचा प्रवास ,ट्रॅक्टरचा प्रवास, मालवाहतूक ट्रक मधून केलेला प्रवास ही वेगवेगळी साधने वापरून केलेला प्रवास ही विशेष. काळानुसार प्रवासाची साधने बदलली .बदलता काळ बघण्याची संधी आम्हाला मिळाली.

 

 

 

 

पूर्वी सार्वजनिक वाहतुकीचा वापर प्रवासासाठी जास्त होता .मुंबई पुणे अशी मोठी शहरे सोडली तर जिल्हा किंवा तालुकास्तरावर चार चाकी वाहने अगदी क्वचितच होती. त्यावेळी प्रवासाचे मुख्य साधन एसटी महामंडळाची बस तरी त्या काळात मालवाहतुकीसाठी आणि प्रवासासाठी बैलगाडीचा वापर होत होता.

 

 

 

त्या काळात मला आई सोबत बैलगाडीने केलेला प्रवास कायम लक्षात राहिला. फोन मोबाईल काहीच नव्हते पोस्ट कार्ड आणि आंतरदेशीय पत्रे होती याद्वारे एकमेकांशी संपर्क केला जायचा.
दुसरी काही संपर्काची साधने होती त्यापैकी एक कैफियत. उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की मग मी आई सोबत आजोळी जात.माहेरची कोणी व्यक्ती आली की मग माझी आई त्यांना माहेरी यायची तारीख सांगत ही कैफियत ती व्यक्ती माझ्या आजोळ च्या लोकांना सांगत.

 

 

 

 

आम्ही एसटी बसने एका फाट्यावर उतरत आणि मग त्या फाट्यावर आजोळ ची मंडळी बैलगाडी घेऊन तयार राहत. मग तिथून पुढचा प्रवास बैलगाडीचा. बायलेकींचा मान करणारी ती मंडळी एसटी थांबली की धावत तिकडे यायची आणि मग आम्ही एसटी बस मध्ये असल्याची खात्री झाल्यावर त्यांना काय आनंद व्हायचा. तो मी बघितला आहे.

 

 

 

 

 

बस मधून उतरल्यावर क्षेमकुशल विचारणा व्हायची. थोडी विश्रांती मग पुढचा प्रवास. दोन गावे एक नदी ओलांडून जावं लागायचं. आम्ही भावंड आई आणि बैलगाडी चालवणारा एखादा मामा बैलगाडीत बसत. उर्वरित तीन-चार माझ्या आजोळ ची माणसं आणि बाबा त्या बैलगाडीच्या मागे मागे चालत. सहजच आईचे लक्ष बैलगाडी ओडणाऱ्या त्या बैलांकडे जायचं आणि मग ती विचारायची खराब झालेत. तेव्हा तो मामा हे उत्तर द्यायचा लहान आहेत अजून कसली नाहीत काम लागलं की उतरतात बघ आक्का. आता शेतीची कामे चालू आहेत.आणि मग त्या गप्पा चालू राहत.

 

(छाया संग्रहित)

काळ्या मातीतून बैलगाडी जाताना बैलांना अवघड जात नसेल पण नदीतील रेती मधून जाताना गाडी ओढताना त्यांना काय त्रास व्हायचा तो अजूनही माझ्या लक्षात आहे .माळ राणातून जाताना चाकांची घडघड व्हायची अजून अधुन मधून आजही माझ्या कानावर ती घडघड येत राहते.

 

 

 

 

बैलगाडी आजोळ च्या हद्दीत आली की मग ती बैल शेत शिवार ओळखायची .ती उमदी जोडी एकमेकांशी स्पर्धा करायची. घरी जाण्याची त्यांची ओढ, पाहुण्यांना घरी पोहोचायची त्यांना झालेली घाई त्यामुळे ती पळायला लागायची तशी बैलगाडी मागे चालणाऱ्यापैकी कोणीतरी पळत पुढे येत त्यांना थांबवत. कासऱ्याला आवरणारी ती उमदी जनावर नव्हती म्हणून त्यांना पुढे येऊन त्यांच्या वेगावर आवर घालावा लागत.

 

 

 

वेग जरी कमी झाला तरी त्यांचा आवेग आणि उत्साह किंचितही कमी होत नसे. मग ती उमदी बैल जोडी आपल्याच थाटात चालू लागायचे आणि मग डौलात आपली मान वर करत तेव्हा त्यांच्या गळ्यातील घुंगरू माळा आणि घाट्यांचा आवाज नव्हे नादब्रह्म मला आनंदित करायचा. पन आई विना जगताना या सुखद आठवणी सुद्धा मला असह्य पीडा आणि वेदना देऊन जातात.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *