स्थानिक पातळीवर समस्याचे निराकरण करण्यात येणार – पालकमंत्री गणेश नाईक

 

 

पालघर दि. २५ सप्टेंबर : जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठस्तरावर जाण्याची आवश्यकता नाही, स्थानिक पातळीवर समस्याचे निराकरण करण्यासाठी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.

 

 

विक्रमगड येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारामध्ये नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

 

 

यावेळी आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे ,सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, विशाल खत्री,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी भवानजी आगे पाटील, जव्हार, उपवनसंरक्षक सैपुन शेख, डहाणू, उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर, विश्वनाथ पाटील, तसेच वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

 

 

पालकमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड येथे आयोजित जनता दरबारात नागरिकांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, मागील काही वर्षांत मध्ये विकास कामाबाबतीत अनियमित्ता झाल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारींबाबत माहिती घेऊन सर्व कामांची चौकशी करण्यात येईल, अनियमित्ता आढळून आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.

 

 

 

या जनता दरबारात जवळपास १७० निवेदन प्राप्त झाले या मध्ये. रस्ते, वीजपुरवठा, पाणी, शिक्षण व्यवस्था, शाळांची पडझड, आरोग्य सेवा, जमीन अधिग्रहण व मोबदला यासारख्या प्रश्नांवर नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

 

 

पालघर जिल्ह्य मध्ये १ कोटी झाडे लावण्यात येणार, बाबू लागवडी मध्ये जिल्हा प्रगतीपथावर आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या बाबतीत समन्वयाने काम करणार आहे.

 

 

जिल्ह्यामध्ये विकास कामासाठी सर्व विभागांना योग्य निधी वाटप करून तातडीने विकास कामे राबवली जाणार आहेत. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सोडवणे ही शासनाची भूमिका आहे.

 

 

ग्रामविकास, वनहक्क, जमीन मोबदला, टॉवर व गॅस पाईपलाईन प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल .पावसाची परिस्थिती पाहता आरोग्य केंद्रांत आवश्यक औषधसाठा उपलब्ध असावा, शाळांमध्ये अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेची काळजी घ्यावी जिल्ह्यातील नादुरुस्त रस्त्यांच्या कामाला गती द्यावी असे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.