सामाजिक कार्याची दखल घेत धनाजी मनोहर जोशी यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित.

सामाजिक कार्याची दखल घेत धनाजी मनोहर जोशी यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित.

देगलूर प्रतिनिधी :- सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य, गरजू व वंचित नागरिकांसाठी सातत्याने कार्य करणारे तसेच जनसेवेच्या माध्यमातून समाजात जनजागृती घडवून आणणारे मा. श्री. धनाजी मनोहर जोशी यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. GVT कृषीकुल, सिरसाळा, ता. परळी वैजनाथ, जि. बीड येथे हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

 

 

दैनिक लोकनेता वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राच्या विविध भागांत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. समाजातील गरजू घटकांसाठी निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याची दखल घेत धनाजी मनोहर जोशी यांची ‘समाजरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

 

 

कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले होते. अशा परिस्थितीत जोशी यांनी गोरगरीब व गरजू नागरिकांना भाजीपाला वाटप करून त्यांना मदतीचा हात दिला. संकटाच्या काळात माणुसकीची सेवा हीच खरी सामाजिक जबाबदारी मानून त्यांनी केलेले कार्य नागरिकांसाठी आधार ठरले. त्यांच्या या सेवाभावी कार्याची आजही परिसरात आवर्जून चर्चा केली जाते.

देगलूर परिसरातही त्यांचे जनसेवेचे कार्य सातत्याने सुरू आहे. महावितरण (MSEDCL), नगरपालिका तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी मार्गदर्शन व पाठपुरावा करण्याचे काम ते करीत आहेत. अनेक गरीब व गरजू नागरिकांना कार्यालयीन कामकाजाची माहिती नसल्यामुळे अडचणी निर्माण होतात. अशा नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जोशी पुढाकार घेतात. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास व आपुलकी निर्माण झाली आहे.

 

 

सामाजिक कार्याबरोबरच जनजागृती, समाजहिताचे उपक्रम आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सकारात्मक कामाला प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. समाजातील प्रश्नांकडे केवळ पाहण्यापेक्षा ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्यक्ष धडपड करण्याची त्यांची कार्यपद्धती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 

 

 

या पुरस्कार सोहळ्याला साप्ताहिक देगलूर टाइम्सचे संपादक गजानन टेकाळे, साप्ताहिक त्रिनेत्र प्रबोधनचे संपादक प्रभू वंकलवार, इंजि. गजानन पाटील मुजळगेकर, आकाश पाटील उंद्रीकर, हेमांडपंथी होट्टल नगरीचे माजी सरपंच शेषेराव सूर्यवंशी, पत्रकार गजानन शिंदे, भाजपाचे सचिन कांबळे, वसंत दादा यांच्यासह सामाजिक, पत्रकारिता व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

 

मान्यवरांच्या उपस्थितीत धनाजी मनोहर जोशी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मिळालेला हा सन्मान देगलूरकरांसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची त्यांची धडपड यापुढेही अशीच सुरू राहावी आणि त्यांच्या कार्यातून नव्या पिढीतील युवकांनी सामाजिक बांधिलकीची प्रेरणा घ्यावी, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.