देगलूरमध्ये भेसळविरुद्ध अर्धवट कारवाई; अन्न प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

देगलूरमध्ये भेसळविरुद्ध अर्धवट कारवाई; अन्न प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

दिवाळी तोंडावर भेसळखोरांचे लोणी—अधिकाऱ्यांची कारवाई फक्त दिखावा की काहीतरी वेगळा ‘सेटिंग’चा मामला?

देगलूर प्रतिनिधी दि.१४:- देगलूर शहरात दिनांक १३ ऑक्टोबर रोजी अन्न भेसळ प्रशासनाकडून केवळ दोन ते तीन दुकानांवर उडतउडत कारवाई झाल्याची घटना समोर आली असून या कारवाईवर सर्वत्र संशय व्यक्त होत आहे.

 

 

दिवाळीचा सण तोंडावर असताना खवा, दूधजन्य पदार्थ, मिठाई आणि तूप यामध्ये भेसळीचा अक्षरशः कहर सुरू असतो. नागरिकांचे आरोग्य धोक्यात असूनही, संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ दिखाऊ कारवाई करून परत निघून गेल्याने ही कारवाई फक्त ‘कागदी घोडे’ नुसते पळवण्यापुरतीच होती का, असा धगधगता प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

नांदेड येथून आलेले अन्न भेसळ अधिकारी खाजगी वाहनातून अचानक देगलूरमध्ये दाखल झाले. अपेक्षा होती—शहरभर धडक तपासणी होईल, भेसळखोरांवर कठोर कारवाई होईल, पण नेमकं उलटच घडलं. अधिकारी दोन–तीन दुकानात जाऊन चार सॅम्पल घेतल्यावर तातडीने दापोरा उचलून पुन्हा नांदेडकडे रवाना झाले.

 

 

 

ही कारवाई एवढ्या गुप्तपणे व मर्यादित दुकानदारांवरच का? बाकीचे दुकानदार ‘दूधाचे धुतलेले’ आहेत का, की काही वेगळे व्यवहार आधीच ठरले होते? असा संशय शहरातील व्यापारी आणि पत्रकार वर्तुळात चव्हाट्यावर आला आहे.

 

 

दैनिक महासागर समाचारचे प्रतिनिधी यांनी संबंधित अधिकारी अनिकेत भिसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “मी नांदेडमध्ये आहे.” मात्र पत्रकारांनी त्यांना देगलूर मार्केटमध्येच प्रत्यक्ष पाहिले होते. यावर त्यांनी पुढे उत्तर दिले—”मी येऊन गेलो, दोन तीन दुकानांवर कारवाई केली आणि परत गेलो.” प्रश्न असा की, मग देगलूरला आले होते ती कारवाई खरंच भेसळविरोधी मोहीम होती की केवळ औपचारिक दिखावा?

 

 

शहरातील इतर पत्रकारांनी सुद्धा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलायलाही नकार दिला. सरकारी अधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना टाळाटाळ करणे म्हणजे संशय आणखी गडद होणेच होय.

 

 

भेसळयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीरपणे न घेता सुटसुटीत कारवाई करून फाईल बंद करण्याचा प्रकार देगलूरमध्ये सुरू झाला आहे का? ही कारवाई कोणाच्या दबावाखाली झाली? काही दुकानांना ‘अस्पृश्य’ का ठेवले गेले? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार सध्या शहरात होत आहे.

 

देगलूर शहरातील नागरिकांची ठाम मागणी—
“अधिकारी पुन्हा देगलूरमध्ये येऊन संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पारदर्शक तपासणी करावी, अन्यथा या कारवाईला आम्ही ‘भेसळग्रस्त कारवाई’ म्हणण्यास मागे हटणार नाही!”