देगलूर प्रतिनिधी दि.२४ :- दिलीप ठाकूर यांच्या मानवतावादी व अखंड समाजकार्यामुळे आपण अवाक झालो असून, त्यांना आतापर्यंत मिळालेले १०५ पुरस्कार हे संपूर्ण मराठवाड्यासाठी भूषणावह असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षण संचालक व प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. गोविंद नांदेडे यांनी केले. खानापूर (ता. देगलूर) येथे झालेल्या संत संमेलनात “भारत माता भूषण दिव्य समाजसेवा पुरस्कार” प्रदान करताना ते बोलत होते. यावेळी दिलीप ठाकूर यांना रोख रक्कम रुपये ५,०००, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

विश्वगुरू भारत माता मंदिर, खानापूर फाटा येथे संत तुकाराम त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ तसेच संत सोपान काका समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. प्रसिद्ध व्याख्याते डॉ. गोविंद नांदेडे यांच्या हस्ते धर्मभूषण ॲड. दिलीपभाऊ ठाकूर यांना “भारत माता भूषण दिव्य समाजसेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. यावेळी सौ. जयश्री ठाकूर यांचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजक तुळशीराम केरले गुरुजी खानापूरकर यांनी प्रास्ताविकात दिलीप ठाकूर यांचे समाजकार्य जागतिक दर्जाचे असल्याचे नमूद केले. सत्काराला उत्तर देताना दिलीप ठाकूर यांनी, भारत मातेच्या नावाने मिळालेल्या या पुरस्कारामुळे आपली जबाबदारी अधिक वाढल्याची भावना व्यक्त करत, आयुष्यभर समाजसेवेत कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील खानापूरकर, सिद्धेश्वर स्वामी महाराज एकलारा यांचे मार्गदर्शन झाले. ह.भ.प. ब्रह्मानंद महाराज जाहूरकर यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथा सादर करण्यात आली. संत संमेलनात अनेक संत, कथाकार, कीर्तनकार व मठाधिपती यांचा सन्मान करण्यात आला. सप्ताह कालावधीत एक कोटी नामचिंतन पूर्ण झाले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
