दै. युवक आधारच्या पत्रकार संवाद बैठकीत पत्रकारांना मार्गदर्शन.
धर्माबाद प्रतिनिधी :- दै. युवक आधार परिवाराच्या वतीने दिनांक २ मे २०२६ रोजी नांदेड येथील रमाई बौद्ध विहार येथे पत्रकार संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दैनिक युवक आधारचे मुख्य संपादक मा. संतोष आमले व सहसंपादक मा. मुकुंद कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत नांदेड व लातूर जिल्ह्यातील प्रतिनिधींशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दैनिक युवक आधारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित ही बैठक विशेष महत्त्वाची ठरली.
बैठकीच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नांदेड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने मुख्य संपादक व संपादकीय टीमचा शाल, पुष्पहार व श्री रेणुका मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना मुख्य संपादक मा. संतोष आमले म्हणाले की, “दैनिक युवक आधार हे सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी पोहोचविणारे प्रभावी माध्यम बनत आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून समाजाला न्याय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी पत्रकारांच्या खांद्यावर आहे. पत्रकारांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने, निर्भीड व निष्पक्षपणे कार्य करत युवक आधार परिवाराशी एकजुटीने जोडून राहावे.”
तसेच त्यांनी सध्याच्या पत्रकारितेसमोरील विविध आव्हाने, पत्रकारांवरील वाढते हल्ले, बदलती सामाजिक परिस्थिती, जबाबदार पत्रकारितेची गरज व सामाजिक बांधिलकी यावरही सखोल भाष्य केले.
सहसंपादक मा. मुकुंद कांबळे यांनी तालुका व जिल्हा प्रतिनिधींच्या विविध अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. आगामी काळात दैनिक युवक आधारचे नेटवर्क अधिक सक्षम करण्यासाठी सर्व प्रतिनिधींनी समन्वयाने व संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या संवाद बैठकीचे सूत्रसंचालन अर्धापूर तालुका प्रतिनिधी अरविंद पांचाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन नांदेड जिल्हा प्रतिनिधी प्रमुख गिरमाजी सूर्यकार यांनी केले.
या बैठकीस किशोर घुडेकर, देविदास एगडे, सत्यनारायण शर्मा, विनोद गगच्चे, संभाजी सूर्यवंशी, गंगाधर कदम, माधव काईतवाड, सय्यद खाजा, प्रकाश गवारे यांच्यासह नांदेड व लातूर जिल्ह्यातील अनेक पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.
पत्रकारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही संवाद बैठक प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली.
