कासार शिरसी प्रतिनिधी :- कासार शिरसी शहराला शुद्ध पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे गेल्या महिनाभरापासून शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असून अनेकांना पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कासार शिरसी–रामलिंग मुदगड मार्गावरील काही व्यापाऱ्यांनी पावसाचे पाणी दुकानात शिरू नये यासाठी डोझरच्या साहाय्याने दुकानासमोर भराव टाकण्याचे काम सुरू केले होते. यावेळी जमिनीखालील मुख्य जलवाहिनी फुटली. संबंधित व्यापाऱ्यांना दुरुस्तीबाबत सांगितले असता त्यांनी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याचे स्थानिकांनी सांगितले.
शुद्ध पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले असले तरी अद्याप ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुरुस्तीचा खर्च कोण करणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. योजनेचा ठेकेदार परळी येथील रहिवासी असून त्याच्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, शहरातील जुन्या नळयोजनेद्वारे चार दिवसांतून एकदाच आणि अत्यल्प प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. काही प्रभागांमध्ये तर गेल्या तीन वर्षांपासून नळांना पाणीच येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गरज अधिक वाढणार असल्याने प्रशासनाने तातडीने जलवाहिनीची दुरुस्ती करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेत जलवाहिनी दुरुस्तीसाठी मदत करण्याची तयारी दर्शविली असून, “पाणी विकत घेण्यापेक्षा दुरुस्ती खर्चासाठी आम्ही निधी देण्यास तयार आहोत,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
