जलाशयातून शेतीसाठी होणारा पाणी उपसा थांबवून मोटारी काढण्याची नागरिकांची मागणी

कासार सिरसी प्रतिनिधी  : वीजपुरवठ्याअभावी कासार सिरसी शहराचा पाणीपुरवठा बंद झाल्याचे वृत्त दैनिक संचारने प्रसिद्ध करताच स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. शहरात सर्वत्र पाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

 

 

कासार सिरसी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्यम प्रकल्पातून सध्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात आहे. आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई तसेच अवर्षणाची परिस्थिती लक्षात घेता जलाशयातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या मोटारी तातडीने काढण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

 

दरम्यान, शहरातील पाणी वितरण व्यवस्थेत नियोजनाचा अभाव असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाण्याची बचत करण्यासाठी प्रत्येक भागात नियोजनबद्ध पद्धतीने सुमारे ४० ते ५० मिनिटे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही होत आहे.

 

 

पाणी हे अत्यंत मौल्यवान संसाधन असून संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने जलसाठा व वितरण व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.