महाबळेश्वर येथील साबने रस्ता सुशोभिकरणासाठी सुवर्णमध्य काढावा- पालकमंत्री

सातारा दि.०९ :-  महाबळेश्वर पर्यटन विकास आराखड्यातील साबने रस्त्याच्या सुशोभिकरणात व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही असा सुवर्णमध्य काढण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.  पर्यटन आराखड्याबाबत काल  महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
      या वेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वर तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, सवानी या विकासक कंपनीचे राम सवानी, महाबळेश्वरचे पोलिस निरीक्षक संदीप भागवत आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार महाबळेश्वर पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, या आराखड्यानुसार   साबने रस्त्याचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा ४ फूट जागा घेण्याचे प्रस्तावित होते. त्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहे. या प्रश्नावर मध्यम मार्ग काढण्यात यावा. व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही असे पहावे. ज्या ठिकाणी कोणतीही अडचण नाही तेथे कामे सुरू करावीत अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
चौकट

साबने रस्ता पहाणी व व्यापाऱ्यांशी चर्चा

यावेळी पालकमंत्री श्री देसाई यांनी साबने रस्ता येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांशी चर्चा करून व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही असा मध्यम मार्ग काढू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *