!! आनंदाच्या शोधात आनंद हरवणाऱ्या !!
!! भौतिक सुखाच्या नादात सर्वस्व गमावणाऱ्या !!
!! मानवा.. थांब कधीतरी मोकळा श्वास घे !!
!! फेकून दे ती जबाबदारी गरज नसताना !!
!! तुला जखडलेली पक्षांचे थवे क्षितिजांना ओलांडताना
कधीतरी निवांत बघ !!
!! घुमवणारा वारा सागराला मागे सोडताना बघ !!
!! अपेक्षा, जबाबदारीचे,ओझे कधीतरी सोडून तर बघ !!
सारं काही करायचं जीवन आनंदी करण्यासाठी !अनं सारं काही केलं सारं काही मिळालं ! नाही मिळाला तो आनंद ! आनंदाच्या जागा चुकीच्या जागी शोधत असतो.
मानवी मनाला संवेदन असतातच बुद्धीने विचार येतात आणि विचारानंतर भावना आणि मग सुख ,दुःख आणि आनंद. मानवाच्या कल्पना वेगवेगळ्या आनंद मानायच्या गरिबा घरी साध्या चॉकलेट ने खुश होणारी लेकरं, तर दुसऱ्याच्या घरी फाईव्ह स्टार ने आनंदित न होणारी लेकरं. एखादा सायकल किंवा मोटरसायकल ला फुल लावून आनंदात फिरणारा, तर एखादा एसी गाडीत बसून दुःखाने प्रवास
करणारा. मग आनंद संपत्ती आणि पैशात आहे का. मग कधी पावसात भिजलो म्हणून दिवसभर किरकिर करणारा, तर दुसरा पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद घेणारा. पन्नास टक्के गुण घेऊन गावभर पेढे वाटणारा,तर ९० टक्के गुण घेऊन घरात रडत बसणारा. घटना तीच पण भाव वेगळे म्हणून तर संत व साहित्य यात सांगितलेले आहे !मन करा रे प्रसन्न !सर्व सिद्धीचे कारण ! या मनाला आनंदित आणि प्रफुलित करण्याची जबाबदारी ज्याची त्याची.
संकटांचा सामना करताना स्वतःला कसं सावरायच आहे हे काय सोपं काम नाही भावनावर विजय मिळवत आणि आपल्या कार्यात यश मिळवणे हे कठीणच पण पूर्णपणे साध्य करायचे असेल तर मग आपण आनंदीत राहिले पाहिजे आपल्या आनंदाच्या जागा आपण शोधल्या पाहिजे त्याच मी शोधल्या त्या निसर्गात ,उत्सवात ,सणात, गरिबांच्या सेवेत ,कोणाच्या अश्रू पुसण्यात, मित्रांच्या यश,अपयशात आणि मुक्या प्राण्यांच्या सेवेत, किंवा त्यांना प्रेम करण्यात आणि म्हणूनच….
मी एक आनंद यात्री बनू शकलो.
या अशा आनंदी प्रवासाविषयी आणि आनंदाच्या जागेविषयी बोलत राहू
मी एक आनंद यात्री
@ राजू पाटील लच्छनकर


