यावर्षी पेरणी योग्य वेळी झाली मोडही जोरात होती. आतापर्यंत पावसानं ही चांगली साथ दिली. खरिपाचे पीक हे पावसा वरच पीक .पाऊस न जशी संधी दिली तशी सर्व शेतावरील कामे उरकून घ्यावी लागतात. ऊन वारा पाऊस या सर्वांचीच मदत शेतकऱ्याला होत असते तर कधी याच गोष्टी शेतकऱ्याच्या विरोधात जातात. शेतकऱ्यांचा सामना निसर्गाशी असतो म्हणून शेती करताना वेळेला महत्व आहे.

निसर्ग आपल्याला जितका वेळ देतो तितक्या वेळात आपल्याला शेतीची कामे उरकून घ्यावी लागतात .शेती हे शारीरिक क्षमता, योग्य नियोजन ,समय सुचकता ,धाडसीपणा तसेच अभ्यासु माणसाचे काम आहे.सोयाबीनचे पीक आता बहरू लागलं होतं .त्या काळ्या मातीत आलेल्या हिरव्यागार पिकाकडे मी बघत होतो. पिकांना आलेल्या कळ्या ,फुल ,फळ माझं लक्ष वेधून घेत होते.
पारंपरिक मूळ शेतकरी कुटुंब त्यामुळे काही माणसे आमच्याशी जोडली गेली आणि सार आयुष्य आमच्या शेतशिवारात काम करण्यात त्यांच गेलं आणि एक वेगळे नातं या मातीशी त्यांच जुळलं आमच्या शेती शिवाराची त्यांना संपूर्ण माहिती होती आणि मग अशा माणसाची माझी नाळ जोडली गेली त्यापैकी एक महाराज.
वारकरी असल्याने प्रेमाने मी त्याला महाराज म्हणतो वय झालं कामही होत नाही पण शेतीशी जुळलेल्या नातं, शेतात फिरल्याशिवाय त्याला करमत नाही आणि मग मी शेतात असलो की ही मंडळी माझ्यासोबत राहतात मला मार्गदर्शन करतात आयुष्यच शेतात गेल्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा आम्हाला नेहमीच फायदा होतो ती चालती बोलते कृषी विद्यापीठे आहेत.
त्यादिवशी महाराज माझ्यासोबत होता मी पिकांची तारीफ करू लागलो तसा महाराज जरा चिंतेत होऊन म्हणाला. पिक चांगली आहेत पण मघा गेल्याशिवाय काही खरं नाही, मघा आणि आभाळाकडे बघा म्हणतात. निसर्गचक्रामध्ये मघा नक्षत्रात पाऊस एकतर अतिशय जास्त पडतो किंवा कधी पडतच नाही त्याच्या या सूचनेमुळे मी सहजच आभाळाकडे बघितलं तर आकाशात काळे कुठ्ठ ढग जमायला लागले होते.
रानातून घरी येता येता संध्याकाळ झाली आणि सारं वातावरणच बदलून गेल होत. पावसाची संतत धार सुरू झाली आणि रात्र होता होता पावसाने रौद्र रुप धारण केलं. कधी संथपणे तर कधी अतिशय वेगाने पावसाने झोडपून काढल. रात्री काही झोप लागली नाही .सहजच भल्या पहाटे बाहेर आलो तर माझी माणसं जागीच होती त्यात आज महाराज होता माझी चिंता ओळखत तो म्हणाला काही खरं नाही वातावरणच बिघडले.
न्याहारीची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली ,पाऊस काय थांबेना. जनावर माणसं त्या निसर्गाच्या कोपामुळे घरात दडली होती. काही उत्साही पोर बिनकामाचे धाडस करून शेतशिवारात फिरून आली आणि होळाचे पाणी वाढू लागले ही बातमी आम्हाला दिली तसा महाराज त्यांना म्हणाला की तिथे जाऊन बघायची काहीच गरज नव्हती पाऊस कालपासून चालू आहे होळ ,लवणी , माळ एकच होतात की नाही ते बघा दुसऱ्या दिवशी दिवसभर पाऊस चालू होता तो मध्यरात्रीपर्यंत.
तिसऱ्या दिवशी पावसाने उघाड दिली.
सूर्यनारायणाचे दर्शन दोन दिवसानंतर झालं .पूर आला होता ही बातमी आता जुनी झाली होती पुराची पाहणी करण्यासाठी काही गावकरी मंडळी ,महाराज आणि मी शेतशिवाराकडे वळलो बघितलं तर काय होळ, लवणी,माळ यांना पुराच्या पाण्याने एकच केलं होतं जिकडे तिकडे पाणीच पाणी .काळ्या मातीतून आलेलं काळसर पाणी आणि तांबड्या मातीतून आलेले तांबड पाणी फरक स्पष्ट जाणवत होता. सारं काही ओलचिंब झाल होत. झाड, वेली ,पशु,पक्षी,जमीन आणि माणसेही.
फक्त माणसं दुःख आणि वेदनेचे अश्रू ने ओली झाली होती .शेतात केलेली मशागत ,केलेले कष्ट ,बी बियाणे, खत ,शेतीचे भांडवल आणि शेतातील पीकही सारं काही संपलं होतं , माझ्यासारख्या शेतकऱ्याला कदाचित फरक पडणार नव्हता पण लहान शेतकऱ्याचे, शेतमजुराचं आयुष्यच उद्ध्वस्त होते की काय यावेदनेने मन व्याकूळ होऊ लागलं, जड मनाने मी माघारी फिरलो तसा महाराज म्हणाला बरं झालं.
मी त्याच्याकडे नजर फिरवली त्यांनी ती ओळखली आणि पुढे म्हणाला कोरडा दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ बरा कमीत कमी ढोर, जनावरांना चारा आणि पाणी तर भेटेल .आयुष्यभर स्वतःच्या भाकरीसाठी जगणारी ही माणसं जनावराच्या चाऱ्याचा विचार करू लागली की मला सुखद वेदना होतात
पूर ओसरून गेला होता पण मी काही शेताकडे गेलो नव्हतो.
मन खिन्न झालं होतं. कदाचित शेतकऱ्याच्या दुःखाची वेदनेची मला पहिल्यांदा जाणीव होत होती म्हणून की काय त्याची तीव्रता ही जास्त असेल .मी निवांत माझ्या ठिकाण्यावर बाजेवर बसलो होतो. महाराज ही होता . तो शेताकडे जाऊ म्हणून आग्रह करत होता मी निराश झालो होतो त्याचा मान ठेवण्यासाठी त्याच्या मागे मागे शेतशिवाराकडे निघालो पुरामुळे सगळं काही उध्वस्त झालं होतं.
शेतात गंडी पडल्या होत्या, झाडे उन्मळून पडली होती , होत्याचं नव्हतं झालं होतं पुरामुळे शेतात गाळ जमा झाला होता आणि त्या गाळाने हिरव्यागार पिकांना जमिनीत गाढलं होतं. ती गाळाची मऊ मुलायम माती मी हातात घेऊन त्याचे निरीक्षण करू लागलो तसा महाराज म्हणाला बेवड झालं जी, पूर्वी मुगा, उडदाची पिकं आम्ही नांगरून जमिनीत गाडून टाकत त्यामुळे जमीन सुपीक आणि माती कसदार व्हायची आताही तसं झालं बघा रब्बी जोरात येणार या त्याच्या वाक्याने मला नवीन धीर मिळाला.
नवीन उत्साहात आणि जोशानं कामाला लागायचं हे मी ठरवलं .माणसांना सूचना दिल्या महिनाभराच्या विश्रांतीनंतर माणस ताजी तवानी होती.संपूर्ण ताकतीन रान वाटेवर आणण्याच्या कामात त्यांनी आपल्याला झोकून दिल. कधी ट्रॅक्टरची मदत घेतली तर कधी बैलांच्या अवताची तर कधी मजुरी करणाऱ्या बायकांची. सार रान वाटेवर आलं काळ्या आई न पूर्वीचे रूप धारन केलं.
उदरातून नविन बिज फुलण्यासाठी ती तयार झाली .हा उत्सव पुरात वाचलेल्या काही वृद्ध जसे चिंच, कडुलिंब, आंब्याची वृक्षे आनंदाने पाहू लागले उत्कृष्ट बियाणं आणलं ,बीज प्रक्रिया केली, त्याला खताची जोड दिली आणि ट्रॅक्टरच्या साह्याने रब्बीची पेरणी केली.
रब्बीची मोड दिसायला बारा ते पंधरा दिवसाचा अवधी लागतो. हा काळ माझ्यासाठी अवघड थोडासा काळजी वाटणारा तसेच अस्वस्थ करणारा आणि संयमाची परीक्षा बघणार असाच पंधरवडा उलटून गेल्यावर मी ठरवलो .आज मोड बघण्यासाठी शेताशिवाराकडे जायचं अंगात तेलंगणाचा पोशाख होता कमरेला जरिचे काठ असलेली पांढरी लुंगी रंगीत शर्ट, गळ्यात उपरणं.
गळ्यातलं उपरणं डोक्याला बांधत. सूर्याच्या पहिल्या किरणा सोबतच मी शेत शिवारात गेलो. ती कवळी उन्हाची किरण पिकाच्या मोडावर पडली होती हरभरा, करडी, ज्वारी, सूर्यफुलांच्या पिकाची मोड त्या कवळ्या उन्हात अन थंड वाऱ्यात नाचत होती जणू काही माझ्या स्वागतासाठी अतुर होती.मी ही आनंदी झालो शेताच्या ह्या धुऱ्यावरून त्या धुऱ्याकडे ,ज्वारीच्या शेतातून हरभऱ्याच्या ,हरभऱ्याच्या शेतातून सूर्यफुलाच्या शेताकडे धावू लागले त्या मोडाचे निरीक्षण करू लागलो.
या सर्व गडबडीत माझी माणसं आणि महाराज ही माझ्या मागोमाग तेथे कधी आले होते हे मला कळल च नाही. महाराज हसत म्हणाला मी म्हणालो नव्हतो का रब्बी जोरात येणार.
त्याचे ते खंगून गेलेले शरीर, शरीरावर वेदनेच्या ,कष्टाच्या पडलेल्या झुरळ्या. त्याच्या त्या कमी नजर असलेल्या डोळ्यांना जीवनाकडे बघायचे नवीन दृष्टी. त्याचं ते बोचऱ्या दातामधून दिसणारे हास्य जणू काही मला जीवनाचे सत्य सांगत होतं नेहमीच आशावादी राहा माझ्या गळ्यातला उपरणं काढलं त्याच्या शरीराभोवती गुंडाळला उपरण्याच्या साह्याने त्याला दोन्ही हाताने माझ्याकडे ओढत गच्च मिठी मारली आणि माझ्या आनंदअश्रू ना वाट मोकळी करून दिली.
@ मी एक आनंद यात्री
राजू पाटील लच्छनकर.
📞 मो.६३०४८७३७२४

