वृक्षवल्ली आम्हा सोयरे वन चरी या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या ओळी वृक्षाचे महत्व आणि आपल्या जीवनातील वृक्षाचे स्थान सांगणाऱ्या. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई हे अंगाई गीत ऐकत आपण मोठे झालो. आईचे मुलावरील प्रेम व काळजी व्यक्त करताना सुद्धा कवीला झाडाचा सहारा घ्यावा लागतो. आधारवड ,कल्पवृक्ष, मायेची सावली, पक्क घट्ट नातं सांगायचे झाल्यास पाळे मुळे पसरली. त्याचे जीवन बहरले असे एक ना अनेक शब्द वाक्यप्रचार झाडाविषयीची आपल्या बोलीभाषेत आहेत.

अलीकडच्या काळात वृक्षांची प्रचंड तोड करण्यातआली .नवीन काही लावली नाही. सरकारी किंवा मग सामाजिक उपक्रम म्हणून वर्षानुवर्षी एकाच खड्यात वृक्षारोपण करणारी मंडळी आणि मग त्याची छायाचित्रे वृत्तपत्र तसेच न्यूज चैनल वर दाखवली जातात हे सर्व काही मी निशब्द होऊन बघतो.पण काही अपवाद असतात.
देगलूरच्या नामवंत व अग्रगण्य व्यापारी कुटुंबाचा वारसा चालवणारा माझा मित्र नितीन मुरलीधरराव वट्टमवार वडिलांच्या सहकार्याने व स्वकर्तुत्वाने देगलूर येथील खडकाळ भागात असलेल्या एमआयडीसी मध्ये दालमीलचा प्रचंड मोठा उद्योग उभा केला. या उद्योग स्थळाला जेव्हा मी भेट दिली तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला.
त्याचे वृक्ष प्रेम मला नुसतं अचंबित करणार नव्हतं तर त्याच्याविषयी प्रेम व आदर वाढवणार होतं. या मित्राने मिलच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची जोपासना केली होती जसे आंबा ,चिकू ,नारळ, चिंच, बदाम,आवळा, बेलाचे झाड, वड, सागवान ,पिंपळ, निलगिरी इतकेच नव्हे तर विविध फुलांची झाडे वेली जसे स्वास्तिक, जास्वंद ,मोगरा, चाफा, गणेरी अन गुलाब ही.
शेतीचे तुकडे पडत गेले आणि झाडावरून बरेच वाद उफाळून आले चिंच, आंबा ,कडुलिंब ,वड, पिंपळ हे महावृक्ष त्यांची जमिनीवर सावली पडली की मग तिथे पीक येत नाही याही कारणाने अनेक शेतकऱ्यांनी झाडांची तोड केली . सुबाभूळ, काटेरी बाभूळ ,बोरीची,जाम, मोहाची, उंबराची झाडेही शेत शिवारात आढळतात.
चिंच ,कडू लिंबू, वड पिंपळ ही झाडे आकारांनी प्रचंड मोठी तसेच त्यांचे वय ही मोठं साधारणतः ७० ते ८० वर्ष पर्यंत त्यांचा आयुष्य असत मग आंब्याचं चिंचेचं, कडुलिंबाचं, वड, पिंपळाचे झाड शेत शिवारात असलं की मग त्या झाडांचा शेतकऱ्यांच्या दोन-तीन पिढ्यांचा संबंध येतो तर जनावरांचा चार ते पाच पिढ्या या झाडाखाली आसरा घेतात.
अशी काही महा प्रचंड असे महावृक्षे माझ्या शेत शिवारात आहेत. ही वृक्षे म्हणजे माझ्या शेतशिवाराची शोभा च.शेती करतानाही वृक्षावर प्रेम जडले. उन्हाळ्यात त्यांच्या सावली त गेल की निवांत झोप लागायची तर पावसाळ्यात हलक्या पावसाच्या सरी पासून ते माझं रक्षण करायचे .सुसाट्याचा वाऱ्यामध्ये ते मला आधार द्यायचे.
हस्ता आणि चित्र हे दोन पावसाळ्याची नक्षत्रे. ही संपली की मग आपल्या भागातला पावसाळा जवळपास संपतो हिवाळ्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्याची चाहूल आंब्याला येणाऱ्या फुलांच्या मोहरामुळे लागते .भर उन्हाळ्यात गोड फळ आंब्याची झाडे देतात. जवळजवळ ऑक्टोबर महिन्यात पावसाळा संपतो त्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी हे फळ आंब्याच्या झाडांना लागतात.
या झाडांची मुळे जमिनीत कुठपर्यंत पोचली असतील ,या झाडाला पाणी कसे व कुठून ही मुळे पुरवत असतील या एक अनेक बाबीचा विचार मनात यायचा .या सर्व प्रश्नांची उत्तरे निसर्ग देऊ शकतो मी नाही . शेतकऱ्यांच्या सर्वात मोठ्या सणांपैकी एक पाडवा, पाडव्यानंतर येणार पहिलं आणि तेही भर उन्हात म्हणून अंबा फळांचा राजा ठरत नसेल का ?.
चिंचही तसेच चिंचेच्या झाडांना हिवाळ्यात फुल येतं मग फुलांचा फळात रूपांतर होतं ,चिंच हळूहळू वाढते आणि हिरवी चिंच झाडावर दिसू लागते. चिंच वाळल्यानंतर त्यात आंबटपणा वाढतो. फार कमी आणि विशेष अशी आंबट गोड चव असणारी चिंचेची झाडे ही असतात तसेच एक झाड माझ्या शेत शिवारात होतं.
नैऋत्य मोसमी वारे प्रचंड वेगाने सुटते हेच वारे ढगांना घेऊन येते आणि पावसाळ्याची सुरुवात होते.

मृग नक्षत्राच्या पूर्वी रोहिणी नक्षत्र येतं याच वेळेला ही नैऋत्य मोसमी वारे शेत शिवारात दाखल होतात तेव्हा ही महावृक्ष निधड्या छातीने त्याला रोखण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची ताकद कळते.
रोहिणी नक्षत्रात शेतीच्या कामात गुंतलो होतो प्रचंड वेगाने नैऋत्य मोसमी वारे माझ्या शेत शिवारात दाखल झाले त्यांच्या वर्चस्वापुढे नमत घेत मी आणि माझी माणसं घरची वाट धरली. आता माझ्या शेत शिवारात वाऱ्याचे साम्राज्य होते आणि माझी झाड निधड्या छातीने त्याचा सामना करत होती.
ताकदवान ही महावृक्ष नमायला तयार नव्हती पण विजेने घात केला आणि माझ्या चिंचेच्या झाडावर कोसळली .क्षणात निर्जीव झालं ते माझं झाड. ते इतके प्रचंड आकाराच होतं त्याला वीज सुद्धा बेचिराख करू शकली नाही पण ते जमिनीवर कोसळलं होतं . मन वाटेल तसं वागून वाऱ्याने आमच्या शेत शिवारा चा ताबा सोडला होता.
चिंचेचे झाड कालच्या वादळ वाऱ्यात विजेच्या तडाख्यात कोसळ होतं ते बघायला गाव जमा झाला होता आणि त्या गर्दीत मी ही. गर्दी कमी झाली त्या झाडासोबत मी आणि माझी माणसं शिल्लक राहिलो. वर्षानुवर्ष फळ आणि सावली देणाऱ्या या चिंचेच्या झाडाशी एक नातं तयार झालं होतं. गावकरी मंडळी मित्र पाहुणे सर्वजण याला ओळखत होते.
शेतीची कामे पुढे नेण्यासाठी त्या झाडाला बाजूला सारणं गरजेचे होते. तुकडे केल्याशिवाय त्या झाडाला बाजूला सारता येत नव्हते .आधुनिक कटिंग मशीन न. त्याचे तुकडे तुकडे करावे लागणार होते .मशीनचा तो कर्क श आवाज माझ्या कानात पडत होता. त्या झाडाचे तुकडे तुकडे करण्यात येत होते तसे माझ्या हृदयाची चाळणी होतं होती आणि मन छीन्ह भिन्न.
माझे वाडवडील हे या झाडाला ओळखत होते. त्यांनाही या झाडांनी सावली दिली होती. ती मायेची सावली मला आता भेटणार नव्हती .मला बरच काही बोलायचं होतं ते आता राहून गेलं. जनावरांची भाषा मला कळत होती पण झाडांना बोलण्यात मी कमी पडलो होतो.पापणी लावण्याचा विलंब होता डोळ्यात पाणी काठावर आलं होतं.
तशी हवेची एक झुळूक आली मनातले नैराशी पळवून नेले. सहजच लक्ष जवळच असलेल्या कडुलिंबाच्या झाडाकडे गेलं. त्या महावृक्षाला फुटलेल्या कवळ्या फांद्यांना ही हवेची झुळूक हलवीत होती . जसं काही तो महावृक्ष मला आपल्याकडे बोलवत होता . आणि म्हणत होता काळजी नसावी मी आहे तितकाच वृद्ध बरेच काही उन्हाळे पावसाळे पाहिलेत.
मी सांगतो तुला तुझा इतिहास ज्याचा साक्षीदार मी आहे .पहिल्यांदा मला झाडांची भाषा कळली होती. आणि एक नवं विश्व च मला भेटलं होतं .त्यांना आता मी बोलणार होतो एक वेगळ्याच आनंदात रमणार होतो . पिढी दर पिढी वंश परंपरागत या झाडांनी आसरा दिला होता. मी ही त्या झाडांच्या आसऱ्याला जाणार होतो.
@ राजू पाटील लच्छनकर
मी एक आनंद यात्री
मो.६३०४८७३७२४
