भारतीय संस्कृतीचे कुळ आणि मूळ शेती .भारताची औद्योगिक क्रांतीला बळकटी देणारी अभियंताची पिढी असो, कोरोना सारख्या महा संकटाला समर्थपणे सामना करणाऱ्या नव्हे हरवणाऱ्या डॉक्टरांची पिढी असो, अनेक डॉक्टर ,इंजिनियर, इकॉनॉमिस्ट,व्यावसायिक ,पत्रकार किंवा कुशल ग्रहणी घडविणारे शिक्षकांची पीढी ,राजकारणी, सरकारी कर्मचारी किंवा मग सैन्य बलात असणारे सैनिक तसेच सैनिकी अधिकारी किंवा मग सिनेमा सृष्टीतील कलावंत असो. कोणत्या ना कोणत्या पिढीत यांचा संबंध शेतकरी कुटुंबाशी होता हे खरे.

आधुनिक शेती, शेतीचे यांत्रिकीकरण ,शेतीचे सरकारी धोरण, शेतीचे पाणी नियोजन, शेतीमालाचे भाव ,शेतीमालाच्या आयात आणि निर्यात धोरण, शेतीचा पतपुरवठा तसेच शेतकरी आत्महत्या हे विषय फारच मोठे आहेत यावर स्वातंत्र लिहाव लागेल पण मी विषय आवरता घेतो.
मी जीवनातील पाच वर्षे फक्त आणि फक्त संपूर्ण वेळ शेतकरी म्हणून शेती केली. या काळात रात्रंदिवस एक वेगळा ध्यास घेऊन मी शेत शिवारात मेहनत केली तितक्याच अनुभवांना उजाळा देतो.
माझे वडील शिक्षक त्यामुळे बालपण एका तालुक्याच्या ठिकाणी गेले. पुढील शिक्षण मोठ्या शहरात घेतलं .शेतीचा माझा संबंध वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी आला तो ही वकील असणाऱ्या काकाच्या आग्रहामुळे.
उन्हाळ्यात पाडव्यापासून शेती कामाची सुरुवात केली. कपड्यांना इन करून पायात चकचकीत बूट ,डोळ्यांना रेबनचा गॉगल घालून शेती करण्यासाठी मी गावाकडे जायचो. एक जुनी मारुती ओमीनी कार काकांनी मला घेऊन दिली होती. ती गाडी घेऊन मी गावाकडे जायचं तेव्हा गावकरी मंडळी आणि आमच्या सर्व माणसांना पक्की शाश्वती होती की हे पोरगं काही शेत शिवारात जास्त वेळ तग धरणार नाही.
उन्हाळ्यात काही वाटलं नाही .उन्हाळा संपला आणि पावसाळा सुरू झाला तसे शेतातील माती भिजली आणि चिखल झाला मी जसा जायचो तसाच माघारी फिरायचो. माझ्या कपड्या बुटांची काळजी करत.
खरिपाची पेरणी झाली निंदन खुरपण फवारणी ही चिखलात झाली मी काही शेतात पाऊल ठेवलं नाही फक्त दुरूनच समाचार घेत होतो. रब्बीही तसंच चिखल नसला तरी त्या हिरव्या रानातून चालताना सापांची भीती वाटायची ठिकाणावर बांधलेल्या बैलाकडे चुकून कधी गेलो तर माझा अवतार बघून तीही माझ्या अंगावर बुजायचि त्यांची भीती मनात बसली. कसं बस एक वर्ष झालं काहीच केलं नाही आणि मला शेतीतलं काहीच कळलं नाही.
काकांनी मला सांगितले की शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते वर्षभर संपूर्ण शेतीची माहिती घेत होते. लवणी ,गंडी,धुरे ,बंधारे याची पाहणी केली. पावसाळ्यात शेतात पाणी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे धावत जमिनीचा पोत कुठे चांगला आहे कुठे साधारण आहे.

गाव ,माणसे ,,जनावरं ही वाडवडीलांची पुण्याई आणि त्यांचे अनेक कष्टाने त्यागाणं वेळप्रसंगी जीवावर बेतलं तरी जपून ठेवलेली ही काळी माती .तिची माहिती घे .तिची राखण कर आणि मातीत मिसळण्याचा आनंद घे. जर हे तू करू शकला नाहीस तर आमच्या माघारी हे सगळे विकून तू मोकळा होशील याचीच काळजी काकांना होती.
त्यांच्या डोळ्यातलं पाणी माझ्यातल्या तरुणाला आव्हान करत होतं तर काळ्या आई विषयी माझ्या मनातील भावना शून्य तेला पाझर फोडत होतं.
नुसते शेतात जात जा. शेत तुला काम सांगल. जे जमलं ते करत जा हळूहळू तुला कळत जाईल हे धीराचे शब्द मला प्रेरित करत होते.
शेतीला मनावर घेतलं सर्वप्रथम तेली रंगाची कपाळावर चद्र असलेली बैल जोडी घेतली. त्यांच्या नादानं गावाकडे जाऊ लागलो .त्यांना चारा टाकणे पाणी पाजणे. पेंड खायला कधी कधी देऊ लागलो. त्यांच्या पाठीवरून हात फिरवणे त्यांची मालिश ही करू लागलो ही जनावर मला चांगले ओळखू लागली. जनावराची कसे नातं जोडायचं आता मी शिकलो होतो. उन्हाळ्यात पडीत रानं दुरुस्त केलं .उन्हाळी कामात ,शेतीच्या मशागतीत लक्ष देऊ लागलो.
नदीकाठच्या जमिनीत पावसाच्या पाण्यामुळे पडलेल्या गंडी उन्हाळ्यात बुजून घेऊ लागलो. शेतात कितीही काम केले तरी कमीच पडतं हे मला कळू लागलं..
जून सुरू झाला पण पाऊस काही पडत नव्हता .मृगाच्या पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहू लागलो. मृगाच्या पावसाची काय किंमत शेतकऱ्याला असते ते मी पहिल्यांदा अनुभवत होतो आणि तो मृगाचा पाऊस पडू लागला तेव्हा त्या पावसाच्या धारात माझ्या आनंद अश्रूंच्या धारा बेमालूमपणे मिसळून गेल्या. मी नुसता रात्रभर पडणाऱ्या पावसाकडे बघत होतो.
सकाळी लगबगीने गावाकडे निघालो .थेट शेतात पोहोचलो. शहरात जास्त वाटणारा पाऊस काळ्या आईची तहान सुद्धा भागवु शकला नव्हता. वरवरची माती भिजली होती आणि ती माती माझ्या बुटांना चिटकत होती बूट जड होत होते माझे लक्ष त्या बुटाकडे नव्हतं मी शेतात फिरून माती किती भिजली ते बघत होतो. शेतात धुंद होऊन मी चालू लागलो आणि माझ्या बुटांनी माझी साथ सोडली बुट फाटून गेले होते आणि मी अनवाणी झालो.
तसाच घरी आलो अनवाणी पायाने, पायाला माती लागली होती कपडे ही चिखलान माखली होती अंग पावसाच्या पाण्यात तसेच घामानं भिजल होत. काकांनी माझ्याकडे बघताक्षणीच ओळखलं शेतीत त्याने पहिलं पाऊल टाकलं.
उन्हाळ्यात जमीन तापते त्यानंतर पावसाळ्यात पाऊस पडतो. जमीन हळूहळू भिजते पावसाचे पाणी जमिनीत मूरत आणि उन्हाळ्यात खाली गेलेली जमिनीची ओल संथ गतीने वर वर येते आणि मग वरची ओल आणि खालची ओल मिसळतात.
अशावेळी पाऊस पडला की मग पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही जमिनीवर साचतं यालाच पाणी जमिनी बाहेर येणं असे म्हणतात
पाणी जमिनीवर आलं आणि पावसान उघाड दिली तर मग वरची तीन ते चार इंच माती वाळते पण त्यांच्या खाली जमिनीत ओल असते. त्याला नंदी ओल म्हणतात किंवा जमिनीला वापसा आला असेही म्हणतात .याच नेमक्या क्षणी जमीन पुनर्निर्मितीसाठी तयार होते हा काळ फार कमी असतो याच नेमक्या क्षणी जमिनीत बियांची पेरणी करावी लागते. ज्याला वापसा कळाला तो अर्धा शेतकरी झाला.
सततच्या पाच वर्षाच्या प्रयत्नानंतर शेतीची पारंपरिक अवजारे बैलांच्या साह्याने शेतीकामात वापरली जातात जसे वक्कर ,नांगर, कोळपे ,दुंडे ,दांड्या, बैलगाडी, जु, साप्त्या ,कासरा ,गोफन नागराची फाळ ,वक्कराची फाळ, रुमन, कोरडा, तिफन, दिंड यांची संपूर्ण माहिती झाली. निसर्गचक्र जसे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सहन करण्याची क्षमता वाढली. पावसाची नक्षत्र ,वाऱ्याची दिशा, आकाशातील चांदण्याचे महत्त्व, पौर्णिमा ,अमावस्या ,वृक्षवेली झाडे ,झुडपे ,त्यांना येणारा फळ फुलांचा बहार हळूहळू मला कळू लागला.
ट्रॅक्टरची आधुनिक अवजारे plough,cultivators,rotavator,sowing machine, harvesters यांची ही माहिती झाली.
नदीकाठच्या जमिनीला पाण्याच्या मोटारीद्वारे तर दुसऱ्या जमिनीला बोरद्वारे पाण्याची व्यवस्था केली. संपूर्ण जमीन ओलिताखाली आणली. पाचव्या वर्षी निसर्गाच्या मदतीने ,माझ्या माणसांच्या कष्टामुळे विक्रमी हरभऱ्याचे पीक काढलं अगदी मनासारखं.
पाच वर्षात शेतीचे ज्ञान कमावलं .रानातील वाऱ्यामुळे माझा चेहरा काळवंडला होता पण आत्मविश्वास उंचावला होता इन करन विसरून गेलो होतो . अनवाणी चालणे माझ्या अंगवळणी पडलं होतं. पिकांमधून चालताना मोबाईलचा आवाज किंवा मग माणसाशी बोलत गेलो त्या आवाजामुळे साप विंचू जवळ येत नाहीत हे मला समजलं होतं. सतत माझ्या गळ्यात बहुउपयोगी उपरणं राहू लागलं होतं नव्हे आता त्याची मला सवय झाली होती.
आज मी आनंदीत होतो कष्टाने काढलेले पिक बाजारात उत्कृष्ट ठरणार होत. मी कपड्यांना इन केली आणि घरात काहीतरी शोधू लागलो तशी माझी पत्नी माझा जुना रेबन चा गॉगल पदरांन पुसत प्रेमाने माझ्या डोळ्यावर ठेवला.
बाहेर येऊन मी चकचकित केलेले बूट घालत होतो आणि प्रेमाने काका माझ्या खांद्यावर स्वच्छ पांढरे उपरणं टाकत होते. शेतकऱ्याचा अभिमान, स्वाभिमान आणि कष्टाच प्रतीक ते उपरणं अलगद खांद्यावरून उचललं डोक्याला बांधलं आणि आनंदात बाजारात गेलो. खरंच आता काळ्या आईच्या कुशीतच मला आनंद वाटू लागला होता.
@मी एक आनंद यात्री
राजू पाटील लच्छनकर
मो. ६३०४८७३७२४

