“शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम”
नांदेड प्रतिनिधी दि.२ :- दिनांक ७ जानेवारी, २०२५ रोजी, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सर्व शासकीय कार्यालयांना, कार्यालयीन सुधारणा करण्यासाठी, १०० दिवसांचा सात कलमी सुधारणा कार्यक्रम आखून दिला होता.
या कार्यक्रमांतर्गत, कार्यालयासाठी संकेतस्थळ, कार्यालयीन सुधारणा, नागरिकांसाठी पुरवण्यात येणाऱ्या सेवांचे सुलभिकरण, जुन्या अभिलेखांचे निंदनीकरण व निर्लेखन, कालबाह्य वस्तू व वाहनांची विल्हेवाट, कार्यालयाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण योजना इत्यादी विषयांवर कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
उपरोक्त कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी ठरवून दिलेली शंभर दिवसांची मुदत दिनांक १६ एप्रिल रोजी संपल्यानंतर, परीक्षेत्रीय कार्यालयाने केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन प्रथमतः पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात येऊन, त्यातून (३) परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षक/उपमहानिरीक्षक कार्यालयांची निवड करण्यात आली होती. यात, नांदेड परिक्षेत्रीय कार्यालयाची देखील निवड करण्यात आली होती.

दिनांक २४ एप्रिल रोजी, भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांनी नांदेड परिक्षेत्रीय कार्यालयाची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला होता. परिक्षेत्रीय कार्यालयाने केलेल्या कार्यालयीन सुधारणा, परिक्षेत्रीय कार्यालयापासून थेट पोलीस ठाण्यांपर्यंत सुरू केलेली ई-टपाल व्यवस्था, गुन्हे अभिलेखांचे संगणकीकरण करून, तपासावर देखरेख ठेवण्यासाठी सुरू केलेली Eagle Eye Crime Investigation monitoring ही प्रणाली, विविध प्रकरणांत नागरिकांना शिघ्रतेने सेवा देण्यासाठी सुरू केलेली “कालबद्ध निर्गती मोहीम”, ग्राम पातळीवर नागरिकांच्या सहभागातून सुरू केलेली “व्यसनमुक्त गांव मोहीम”, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पातळीवर सुरू केलेली “तक्रार निवारण केंद्रे”, पोलीस ठाणे पातळीवर राबविलेले “तक्रार निवारण दिन”, इत्यादी कामकाजाची परिषदेने दखल घेतली होती.
भारतीय गुणवत्ता परिषदेने आज रोजी, महाराष्ट्र दिनी यासंबंधीचा निकाल घोषित केला असून त्यातून, राज्यातील सर्व पोलीस परिक्षेत्रांतून द्वितीय येण्याचा मान नांदेड परिक्षेत्र कार्यालयास मिळाला आहे.
कार्यालयातील पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांनी अहोरात्र घेतलेल्या परिश्रमामुळेच हे यश मिळवणे शक्य झाले असून, या यशात त्यांचे सोबतच परीक्षेत्रातील प्रत्येक अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा वाटा आहे, असे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले आहे.

