धाराशिव पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध – दोषींवर कठोर कारवाईची मागणी.
धाराशिव (दि.२३ सप्टेंबर) : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या भीषण हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात वाईस ऑफ मीडिया व धाराशिव जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
घडलेल्या प्रकारानुसार, दिनांक २० सप्टेंबर रोजी (शनिवार) झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंग परिसरात काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक व लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीस कलंक लावणारी बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार व विविध प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी पत्रकार अहोरात्र परिश्रम घेतात, त्यामुळे अशा हल्ल्यांना सहन केले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
पत्रकार संघटनांनी हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करून पत्रकारांना योग्य न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
