देगलूर प्रतिनिधी दि.१४ :-देगलूर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक प्रभागातून नवे- जुने असे इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहेत. काही इच्छुक थेट मैदानात उतरले आहेत तर काहीजण पक्षाच्या तिकिटाच्या प्रतीक्षेत आहेत. तर काहींच्या गोटात कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची ब्रँडिंग, प्रचारफेऱ्या, मतदारांच्या भेटीगाठी, ज्येष्ठ नागरिकांकडून आशीर्वाद घेणे – हा कार्यक्रम तापू लागला आहे.
मात्र या सगळ्यात निवडणुकीच्या समीकरणात दुर्लक्षित होत आहे ते पत्रकारांचे महत्त्वाचे योगदान. वर्षभर समाजघडामोडी, राजकीय कार्यक्रम, सामाजिक कार्य, तसेच हौसे-गवसे-नवसे यांच्या बातम्या प्रसिद्ध करून लोकांपर्यंत पोहोचवणारे पत्रकार आज दिवाळीच्या काळात मात्र दुर्लक्षित होत आहेत. माजी नगरसेवक असोत किंवा नवीन इच्छुक उमेदवार – अनेकांनी पत्रकारांना जाणीवपूर्वक बगल देण्याचे धोरण अवलंबल्याची चर्चा आहे.
पत्रकारांचे म्हणणे असे –
“प्रचारासाठी आम्हालाच शोधतात, कामं झाली की फोन उचलत नाहीत. आणि आता दिवाळी आली तर लहानशी जाहिरात द्यायलादेखील हात आखडता घेतात. हे योग्य नाही.”
दिवसभर फिरून लोकांपर्यंत माहिती पोहोचवणारे पत्रकार समाजजीवनाचा मजबूत आधारस्तंभ आहेत. पण निवडणुकीचा काळ आला कीच पत्रकारांची आठवण ठेवणाऱ्या लोकांबद्दल नाराजी वाढत चालली आहे.
कारण वर्षभर जनतेपर्यंत पोहोचणारा तुमचा विचार आणि तुमचे काम कोण पोहोचवतं – सोशल मीडिया नाही, तर स्थानिक माध्यमे आणि पत्रकारच पोचवतात.
देगलूरमधील पत्रकार वर्तुळात सध्या एकच चर्चा –
“उमेदवारी मिळाली की पत्रकारांचा खूप उपयोग, आणि दिवाळी आली की विसर – हे आता चालणार नाही.”
आगामी निवडणुकांमध्ये पत्रकारांचा मूक विरोध अनेक उमेदवारांच्या वाटेला मोठा अडथळा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय पातळीवर सुरू आहे. कारण जो पत्रकारांचा मान राखेल, संवाद ठेवेल, पत्रकारितेचा सन्मान करेल – त्याच्याकडेच समाजाचेही लक्ष वेधले जाणार आहे.
पत्रकारांची नम्र परंतु ठाम भूमिका अशी आहे –
सन्मान हवा – सुखाचेही आणि दुःखाचेही साथीदार आम्ही आहोत.
वर्षभर बातम्या करून मदत करायची आणि दिवाळीत मात्र जाहिरातीपासून पळ काढायचा – हे अन्यायकारक आहे.
जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकार महत्त्वाचे आहेत – त्यांचाही आदर झाला पाहिजे.
