थंडीशी झुंज देणाऱ्या गरजूंना दिलासा; खुशी सेवाभावी संस्थेचा ब्लँकेट व बॅग वाटप उपक्रम.

 

देगलूर प्रतिनिधी दि.२१ :- शहर व परिसरात तापमानात झालेल्या लक्षणीय घटेमुळे उघड्यावर व पाल टाकून राहणाऱ्या गरजू नागरिकांचे हाल वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक जाणिवेतून मदतीचा हात पुढे करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष एकनाथ (बबलू) टेकाळे यांच्या नेतृत्वाखाली गरजू नागरिकांना ब्लँकेट तसेच दैनंदिन गरजेच्या साहित्याची बॅग वाटप करण्यात आली.

 

 

थंडीच्या दिवसांत आरोग्य बिघडू नये व कडाक्याच्या थंडीपासून काही प्रमाणात संरक्षण मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. प्रत्यक्ष रस्त्यावर, मोकळ्या जागी व पाल टाकून वास्तव्यास असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचून मदत करण्यात आली. ब्लँकेटसोबत देण्यात आलेल्या बॅगमुळे गरजूंच्या दैनंदिन गरजांना आधार मिळाला.

 

 

मदत स्वीकारताना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी असे उपक्रम सातत्याने राबवणे हीच खरी सेवा असल्याचे मत यावेळी अध्यक्ष एकनाथ (बबलू) टेकाळे यांनी व्यक्त केले.

 

 

या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक उपस्थित होते. भविष्यातही गरजूंसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आला.