सार्वजनिक जीवनाचा गौरव; अशोकराव चव्हाण ठरले नांदेड भूषण- शिवप्रसाद राठी व दिलीप ठाकूर यांची घोषणा.
नांदेड प्रतिनिधी,दि.२१:- माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांना त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक, प्रशासकीय व सामाजिक योगदानाबद्दल पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे वर्ष २०२६ चा मानाचा “नांदेड भूषण पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.
रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी रोजी कै. चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान, नांदेड येथे आयोजित दोन दिवसीय “नरेंद्र–देवेंद्र महोत्सव” अंतर्गत होणाऱ्या काव्य मैफिलीत हजारो रसिकांच्या साक्षीने मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी व संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी दिली.
अशोकराव चव्हाण यांनी पुरस्कार स्वीकारण्यास संमती दिल्यामुळे “नांदेड भूषण” पुरस्काराच्या प्रतिष्ठेत अधिक भर पडली आहे. विशेष म्हणजे या पुरस्काराचा पहिला मान ज्येष्ठ पत्रकार सुधाकराव डोईफोडे यांना प्रदान करण्यात आला होता. सन २००० साली दुसऱ्या पुरस्कारासाठी अशोकराव चव्हाण यांच्याकडे विचारणा करण्यात आली होती; मात्र वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी त्या वेळी नम्रपणे नकार दिला होता. यंदा संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांच्या विशेष आग्रहामुळे त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास संमती दिली असून, याकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.
अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये ११ हजार, स्मृतिचिन्ह, मानपत्र व महावस्त्र असे आहे.
अशोकराव चव्हाण यांचा राजकीय प्रवास अत्यंत व्यापक व प्रभावी राहिला आहे. त्यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली असून, चार वेळा आमदार, दोन वेळा लोकसभेचे खासदार, एक वेळा विधानपरिषदेचे सदस्य तसेच सध्या राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी काम केले आहे.
सन १९८५ मध्ये संजय गांधी निराधार योजना नांदेड शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. १९८७ ते १९८९ या काळात ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. १९९२ मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले, तर १९९३ मध्ये सार्वजनिक बांधकाम, नगरविकास व गृह विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये प्रवेश केला.
१९९९ पासून मुदखेड व भोकर मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व केले. महसूल, परिवहन, उद्योग, सांस्कृतिक कार्य, खाणी व प्रोटोकॉल आदी महत्त्वाची खाती त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून समर्थपणे सांभाळली.
८ डिसेंबर २००८ ते १५ ऑक्टोबर २००९ आणि ७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१० या काळात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले. २०१४ मध्ये ते पुन्हा नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले, तर २० फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभेतून ते राज्यसभेवर निवडून गेले.
राजकीय कार्यासोबतच नांदेडच्या सांस्कृतिक, क्रीडा व विकासात्मक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. “अशोकराव यांचे नांदेड” अशी ओळख राज्य व देशपातळीवर निर्माण झाली आहे.
सार्वजनिक जीवनातील त्यांच्या दीर्घ, प्रभावी व प्रेरणादायी कार्याचा गौरव म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे वर्ष २०२६ चा “नांदेड भूषण पुरस्कार” अशोकराव चव्हाण यांना प्रदान करण्यात येत असून, त्यांच्या संमतीमुळे या पुरस्काराच्या प्रतिष्ठेत भर पडल्याची भावना नांदेडकरांत व्यक्त होत आहे.
