“लिपिक ते उपायुक्त : नांदेडच्या विकासशिल्पकार रत्नाकर वाघमारे यांना ‘नांदेड भूषण’चा मान”.

 

नांदेड प्रतिनिधी दि.२७ :- माजी मनपा उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांना त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय, विकासात्मक व सामाजिक योगदानाबद्दल पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे वर्ष २०२४ चा मानाचा “नांदेड भूषण पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी कै.चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान, नांदेड येथे होणाऱ्या “नरेंद्र–देवेंद्र महोत्सव” या दोन दिवसीय काव्य मैफिलीत हजारो रसिकांच्या साक्षीने मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी ,संयोजक धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांनी केली आहे.

 

 

 

 

 

नांदेडच्या विकासकथेतील अनेक सुवर्णपाने ज्यांच्या निष्ठावान परिश्रमांनी लिहिली गेली, असा एक शांत, कर्मयोगी अधिकारी म्हणजे रत्नाकर कांतराव वाघमारे. पद, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धीपेक्षा कर्तव्यालाच देव मानून त्यांनी आयुष्यभर शहराची सेवा केली. प्रशासकीय यंत्रणेत काम करताना त्यांनी केवळ फाईली हलवल्या नाहीत, तर शहराचे भवितव्य घडवले. अशा या कर्तृत्ववान अधिकाऱ्याच्या सेवेला मानाचा मुजरा करण्यासाठी “नांदेड भूषण पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये ११,०००, स्मृतिचिन्ह, मानपत्र व महावस्त्र असे आहे.

 

 

 

 

 

रत्नाकर कांतराव वाघमारे यांचा जन्म दिनांक २०/०३/१९६४ रोजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कुकुडगाव येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण उस्माननगर येथे झाले असून, नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

 

 

 

 

 

 

नगरपालिकेत लिपिक पदापासून सेवेला सुरुवात करून महानगरपालिका उपायुक्त पदापर्यंत मजल मारणारे वाघमारे हे देशातील एकमेव उदाहरण मानले जाते. त्यांनी नांदेड–वाघाळा महानगरपालिकेत तब्बल बारा वर्षे सहाय्यक आयुक्त म्हणून व बारा वर्षे उपायुक्त म्हणून कार्य केले. यशदा मार्फत नागरी व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. चीनचा अभ्यास दौरा करून त्यांनी आधुनिक नागरी संकल्पनांचा अभ्यास केला.

 

 

 

 

 

 

 

सन १९९४–९५ मध्ये नांदेड शहरात प्लेगसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना त्यांनी युद्धपातळीवर काम करून ती आटोक्यात आणली. “संकटाच्या काळातही धीर न सोडता, शहरासाठी उभे राहणारे अधिकारी म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.”

 

 

 

 

जकात विभागाचे प्रमुख असताना केवळ आठ कोटी उत्पन्न असलेल्या महानगरपालिकेचे स्थानिक संस्था कर (एलबीटी) वाढवून तब्बल १०० कोटींपर्यंत उत्पन्न मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. याच कार्यामुळे नांदेड–वाघाळा महानगरपालिकेला दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपयांचा ग्रँट मिळू लागला.

 

 

 

 

गुरतागदी मध्ये ३८ रस्त्यांवरील भूसंपादन करून अतिक्रमणे हटविणे व रस्त्यांचे विस्तारीकरण, जेयूएनएनआरवायएम योजनेअंतर्गत नांदेड शहरात वॉटर सप्लाय, ट्रेनिंग पूल, रस्ते, नदीघाट विकास, १९ नवीन पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम, हिंगोली गेट व गोवर्धन घाट पुलाचे बांधकाम पूर्ण करणे, अर्धवट असलेला नाव घाट पूल पूर्ण करणे अशी अनेक महत्त्वाची विकासकामे त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाली. “नांदेड शहराच्या प्रत्येक रस्त्यात, प्रत्येक पुलात आणि प्रत्येक पाण्याच्या टाकीत त्यांच्या श्रमांची पावले उमटलेली आहेत.”

 

 

 

 

 

 

सन १९८५ ते २०१७ या काळात नांदेडमध्ये झालेल्या सर्व निवडणुकांचे प्रमुख म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. “आदर्श कर्मचारी”, “उत्कृष्ट अधिकारी” यांसह अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. वाचन हा त्यांचा छंद असून सतत कार्यरत राहण्याचा ध्यास हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. “लिपिक पदापासून उपायुक्त पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ प्रशासकीय प्रगतीचा नव्हे, तर जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक परिश्रमांचा प्रेरणादायी इतिहास आहे.”

 

 

 

 

 

३८ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असून, पुढील आयुष्य समाजकार्यासाठी वाहून घेण्याचा निर्धार केला आहे. प्रशासनातील सेवेला त्यांनी केवळ नोकरी मानले नाही, तर ती साधना मानली. नांदेड हे शहर अधिक सुसज्ज, सक्षम आणि सुंदर व्हावे, यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. आज ते सेवेतून निवृत्त झाले असले, तरी त्यांच्या कार्याचे ठसे शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात जिवंत आहेत. नांदेडच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या या कर्तृत्ववान अधिकाऱ्याच्या दीर्घ, निष्ठावान व प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यात येत आहॆ.

 

 

अशा कर्मयोगी अधिकाऱ्याला “नांदेड भूषण” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करणे, ही केवळ व्यक्तीची नव्हे तर प्रामाणिक प्रशासनाचीही गौरवगाथा ठरणार आहे.