जळकोट प्रतिनिधी: महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विराळ येथे आयोजित करण्यात आलेले ‘जागृत महिला सक्षमीकरण शिबिर’ उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाले. महिलांना स्वावलंबी व उद्योजक बनवण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला डॉ. तानाजी चंदावर, उद्योजिका सौ. सुमिता कावळे, सरपंच संतोष प्रभाकर पवार, ज्येष्ठ माजी चेअरमन रामराव एकलोरे, सीआरपी स्वाती तुळशीराम जाधव, माजी उपसरपंच पांडुरंग वाघमारे, शोभाताई गौतम भालेराव, आशा कार्यकर्ती शोभा शिवमुर्ती वाघमारे, रोजगार सेवक दत्ता गोविंद वाघमारे तसेच समर्थ धोंडूतात्या कमिटीचे लक्ष्मण एकलोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक विशाल पाटील आणि प्रमुख वक्त्या सुमिता कावळे यांनी महिलांशी संवाद साधताना आजच्या काळात महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता स्वतःचा व्यवसाय उभा करून आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. त्यांनी आवळ्यापासून २० हून अधिक उत्पादने तयार करून त्यांची विक्री कशी करावी, याची सविस्तर माहिती दिली.
डॉ. तानाजी चंदावर यांनीही महिलांना स्वावलंबनाचा संदेश देत विविध उद्योगसंधींबाबत मार्गदर्शन केले. आदर्श शिक्षक मारुती घोटरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले, तर सरपंच संतोष पवार यांनी गावात अशा महिला सक्षमीकरण उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल आयोजक अमोल भालेराव, सूरज भालेराव व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी अमोल भालेराव यांनी सांगितले की, गावातील महिला आणि तरुण पिढीला सक्षम करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शिबिरात महिलांना आवळ्यापासून घरच्या घरी १५ पेक्षा अधिक उत्पादने तयार करून त्यांची विक्री करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला असून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
या उपक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ विराळ यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचा सत्कार करून शिबिराची सांगता करण्यात आली.
